श्रीगोंदा तालुक्यातील उत्तर पूर्व भागात असलेल्या एका गावात बारावी सायन्स शाखेत शिकत असलेल्या,एका १९ वर्षीय युवकाने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. त्याला आत्महत्या करण्यासाठी तेथीलच काही लोकांनी प्रवृत्त केली असल्याची तक्रार,पीडित वडिलांनी दिनांक १० जून रोजी दिली आहे.सदरील घटना दिनांक १८ एप्रिल रोजी संध्याकाळी घडली असून,या पीडित कुटुंबाने याप्रकरणी पाठपुरावा करीत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केल्याचे समजते आहे.गावातीलच रहिवाशी असलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत या तरुणाचे प्रेमसंबंध होते. या प्रकरणी मुलीच्या घरच्यांनी गेल्या तीन महिन्यांपुर्वी मुलास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दिनांक १८ एप्रिल रोजी सर्वजण घरी असतांना,गावात जातो म्हणून गेलेला मुलगा,घरी आला नाही. बराच वेळ फोन केला मात्र उचलत नाही ,म्हणून घरातील लोकांनी शोधाशोध केली असता, दुसऱ्या दिवशी तो त्यांच्याच शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत मयत अवस्थेत आढळला.पोलिसांच्या मदतीने त्याचा मृतदेह खाली घेऊन,१९ एप्रिल रोजी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यू ची नोंद केली.
मात्र मयत युवकाच्या वडिलांनी व घरांतील लोकांनी या प्रकरणी पाठपुरावा करीत, मुलाला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे स्पष्ट केल्याने,दिनांक १० जून रोजी याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून,श्रीगोंदा पोलिसांनी सात जणांच्या विरुद्धच्या भा.दं.वि.कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.