राजकीय हस्तक्षेप नको म्हणणाऱ्यांना पाणीप्रश्नी अभ्यासाची आवश्यकता.
— घोड-कुकडी प्रश्नी भाजप नेत्यांचा,आमदारांवर हल्ला —
श्रीगोंदा, दिनांक १७ जून:
कुकडी प्रश्नी राजकीय हस्तक्षेप नको म्हणणाऱ्या आमदार राहुल जगताप यांना योग्य अभ्यास व माहिती घेण्याची आवश्यकता असल्याची खरपूस टीका भाजप चे ज्येष्ठ नेते गणपतराव काकडे, पोपटराव खेतमाळीस व युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संदिप नागवडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मंत्र्यांनी कुकडी प्रश्नी हस्तक्षेप केला नसता तर,मागील आवर्तन मिळाले असते का ? आमदार जगताप यांनी भान ठेवून वक्तव्य करावे असे ही भाजप नेत्यांनी म्हटले आहे.
खेतमाळीस, काकडे व नागवडे यांनी प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, ” कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत गप्प बसून पाणी मिळत नाही.त्यासाठी भांडावे लागते, बोलावे लागते, हस्तक्षेप करावा लागतो. मागे एका बैठकीसाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते गैरहजर असल्याने,पाणी सुटण्यास उशीर झाला. शेवटी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना विनंती केल्याने पाणी सुटले. कडाके वाजवून, जागरण गोंधळ करून, चाऱ्यात मुक्काम करून, वेल्डिंग तोडून,स्टंटबाजी करून पाणी मिळत नाही. त्यासाठी अभ्यासपूर्ण मत योग्य ठिकाणी मांडावे लागते. ही जबाबदारी लोक प्रतिनिधीनी लक्षात घेतली पाहिजे.”
राजकिय महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोक प्रतिनिधींंनी जनतेच्या भावनांशी खेळ केला. स्वतःला पद मिळाले.मात्र,शेतकऱ्यांचे गेल्या पाच वर्षात झालेल्या लाखो रुपये नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? हे ही आ.जगतापांनी जाहीर करावे. घोड कुकडी च्या पाण्यासाठी श्रीगोंद्यात पाणी परिषद पार पडली. यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ,पोपटराव पवार व कुकडीचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांनी घेतलेली भूमिका निश्चित अभिनंदनीय आहे. अश्या बैठका सातत्याने होणे गरजेचे असून,त्याद्वारे जबाबदार व्यक्तीच्या ज्ञानात थोडी तरी भर पडेल, असा चिमटा ही काकडे, खेतमाळीस व नागवडे यांनी काढला आहे.
