श्रीगोंदा | प्रतिनिधी
घोगरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुजाता मिलिंद भोसले यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला पद रद्द करण्याचा अर्ज जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांनी फेटाळून लावत सरपंचांना मोठा दिलासा दिला आहे.
या प्रकरणात घोगरगाव येथील विजया सुदाम बोरुडे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 च्या कलम 14(1) व 16 अन्वये ग्रामपंचायत वाद अर्ज क्र. 13/2026 दाखल केला होता. अर्जात सरपंचांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला होता.
मात्र, प्रकरणातील उपलब्ध कागदपत्रे, सुनावणीतील युक्तिवाद व पुराव्यांचा विचार करून जिल्हाधिकारी यांनी अर्ज मंजूर होण्यास पात्र नसल्याचे नमूद करत अर्ज फेटाळून लावला.
दि. 23 जुलै 2026 रोजी पारित झालेल्या आदेशानुसार अर्ज नामंजूर करण्यात आला असून, सरपंच सुजाता भोसले यांच्या पदाबाबत कोणताही प्रतिकूल आदेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांचे सरपंचपद कायम राहणार असून त्यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.
या निर्णयामुळे घोगरगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, सरपंच समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
