दिनांक ६ नोव्हेंबर २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून शहरात जोरदार राजकीय घडामोडींना वेग आला असून, याच पार्श्वभूमीवर आज गोरख आळेकर यांनी ‘शहर विकास आघाडी’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. शहरातील राजकारणात अनेक वर्षांपासून चाललेल्या ‘नेत्यांच्या गुलामी’ आणि ‘विकास विरोधी’ प्रवृत्तीविरुद्ध हा निर्णय घेण्यात आल्याचे आळेकर यांनी स्पष्ट केले आहे.

प्रमुख घोषणा:
- ‘शहर विकास आघाडी’ स्थापन करण्याचा निर्णय.
- आगामी निवडणुकीत २२ जागांवर आणि नगराध्यक्षपदासाठी संपूर्ण पॅनेल उभे करणार.
- जात-धर्मापलीकडे जाऊन केवळ विकास या मुद्द्यावर निवडणूक लढवणार.
शहरातील मतदारांना उमेदवार निवडण्याचा अधिकार नाही का?
शहर विकास आघाडीचे मार्गदर्शक गोरख आळेकर यांनी येथील प्रस्थापित राजकीय प्रथेवर जोरदार टीका केली आहे. “शहरातील नगर पालिका, शहरातील मतदार आणि शहरातील नागरिकांना आमचा उमेदवार कोण ठरवायचा, याचा अधिकार नाही का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.आळेकर म्हणाले, “आम्हाला आजपर्यंत आमच्या शहरातील निवडणुकीला काष्टी, वांगदरी, घोगरगाव, पिंपळगाव पिसा येथील नेत्यांचे उंबरे झिजवावे लागतात. तेव्हा आमच्या शहरातील उमेदवाराला उमेदवारी मिळते, पण तो त्या नेत्याचा गुलाम असेल तरच! नेत्यांची झोळी भरली की उमेदवारी अशीच प्रथा परंपरा आतापर्यंत चालू आहे.”
‘गुलामगिरी‘ झुगारून ‘विकास’ हाच मुख्य मुद्दा या नेत्यांना शहराच्या विकासाचे काहीच घेणे-देणे नाही, फक्त पैसे कमविणे हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे, अशी टीका आळेकर यांनी केली. शहर विकासासाठी आघाडी करण्याची चर्चा असताना, काल बैठकीत ‘शहर विकास आघाडी करू नये’ असा सल्ला काही लोकांनी दिला होता. यावर आळेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
“आमच्या शहराची निवडणूक आम्ही करायची की नाही हे तुम्ही आम्हाला सांगणार? आम्ही कोणाचे गुलाम नाही. त्यामुळे तुम्ही हा सल्ला तुमचे जे कोणी गुलाम असतील त्यांना द्या, आम्हला नको,” असे ठणकावून सांगत आळेकर यांनी सर्व ‘गुलामगिरी’ झुगारून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
गोरख आळेकर यांनी सांगितले की, ‘शहर विकास आघाडी’ आगामी निवडणुकीत २२ जागा आणि नगराध्यक्ष असा संपूर्ण पॅनल बनवत आहे. या पॅनलमध्ये नेत्यांचे गुलाम नसतील, अशा तरुण, तडफदार आणि शहराच्या विकासासाठी दूरदृष्टी असणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी शहर विकास आघाडीशी संपर्क साधण्याचे आवाहन गोरख आळेकर यांनी यावेळी केले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)



Advertise…

