स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांनी कामगारांना आपल्या परिवारातील सदस्य समजून सन्मानाची वागणूक दिली.: चेअरमन राजेंद्रदादा नागवडे..

दिनांक २ जुन २०२४, श्रीगोंदा:

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत कामगारांचे योगदान मोलाचे असून नागवडे कारखान्याचे कामगार हे नागवडे परिवारातील घटक असल्याचे मानूनच गेले ५० वर्षात कामगारांना सन्मानाची वागणूक दिली व कामगारांनी कारखाना आपला समजूनच काम केल्यामुळे कारखाना यशस्वीरित्या वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी केले.

एक जून रोजी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यातील २६ कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सदर प्रसंगी त्यांना फेटाबांधून व पूर्ण पोषख देऊन सत्कार करत निरोप देण्यात आला. सदर प्रसंगी नागवडे बोलत होते.

यावेळी नागवडे पुढे म्हणाले की,  कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत कामगारांचे योगदान मोलाचे असल्यामुळे स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांनी कामगारांना आपल्या परिवारातील सदस्य समजून सन्मानाची वागणूक दिली. तोच संस्कार आज अखेर जपण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. परंतु काळाच्या ओघात झालेले बदल,  खाजगीकरणाशी वाढलेली स्पर्धा व सहकारी साखर कारखानदारी समोरील आव्हाने पेलण्याकरिता या पुढील काळात कामगारांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

कारखान्यातील सेवेमुळे कामगारांची आर्थिक कौटुंबिक व शैक्षणिक प्रगती झाली. त्यांची मुले मुली उच्च शिक्षित झाले असून, विविध क्षेत्रात त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक सुबत्ता वाढलेले असून, सामाजिक उंची वाढलेली आहे. भावी काळात सहकारी साखर कारखानदारी टिकविण्याचे उत्तरदायित्व संचालक मंडळांबरोबरच कामगारांचेही आहे. सभासद शेतकऱ्यांनी व संचालक मंडळाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याकरिता कामगारांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून मोठ्या जिद्दीने व आत्मीयतेने काम करावे लागणार आहे. अन्यथा सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही.

अध्यक्षपदावरून बोलताना साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस कॉ.आनंदराव वायकर म्हणाले की, स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांनी कामगारांना सातत्याने सन्मानाची वागणूक दिली. कामगारांचे प्रश्न सोडविणे करिता कधीच टाळाटाळ केली नाही. तोच वारसा राजेंद्रदादा नागवडे यांनी चालविला आहे. अन्यत्र अशी परिस्थिती नाही. गेल्या कित्येक वर्षात कामगारांच्या मागण्यांकरिता कधीही आंदोलन करण्याची वेळ आली नाही. नागवडे यांनी नेहमीच उदात्त दृष्टिकोन ठेवून सभासद, शेतकरी व कामगार यांना योग्य न्याय दिलेला आहे. त्यामुळे नागवडे परिवाराची विश्वासार्हता ही फार मोठी आहे.  कामगार संघटना सदैव भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे.

सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे म्हणाले की,  श्रीगोंदा तालुका वैभवाच्या शिखरावर उभा करण्यामध्ये नागवडे परिवाराचे योगदान हे सर्वश्रेष्ठ असून, तालुक्याच्या आजच्या सर्वांगीण विकासाच्या मुळाशी नागवडे सहकारी साखर कारखानाच आहे.

सदर प्रसंगी संचालक विठ्ठल जंगले, सावता हिरवे, मारुती पाचपुते तसेच चंद्रकांत लबडे, दिनेश इथापे, मधुकर काळाने, दिलीप कळसकर, संजय कळसकर, संजय लबडे, कुंडलिक शिर्के सर यांच्यासह कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक सतीश जांभळे, चीफ इंजिनिअर दत्तात्रय तावरे, प्रोडक्शन मॅनेजर नाना कळमकर, शेतकी अधिकारी सचिन बागल, प्रसाद भोसले, कोजन मॅनेजर भरत नलगे , स्टोअर किपर कानिफनाथ गव्हाणे, सुरक्षा अधिकारी बाळासाहेब लगड, लेबर ऑफिसर भास्कर जंगले, कामगार युनियनचे अध्यक्ष रामभाऊ लबडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व कामगार उपस्थित होत. भाऊसाहेब बांदल यांनी स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. तर, दत्तात्रय खामकर यांनी आभार मानले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading