दिनांक १६ फेब्रुवारी २०२५,श्रीगोंदा:
तालुक्यातील पेडगाव (पांडे पेडगाव) येथील धर्मवीर गड (बहादुरगड) हा छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला किल्ला सध्या पर्यटक आणि इतिहासप्रेमींमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटामुळे संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्याने प्रकाशझोतात आला आहे. त्यामुळे राज्यभरातील शंभोप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि पर्यटकांनी या स्थळाला भेट देण्यास सुरुवात केली आहे.
धर्मवीर गडावर पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी येथे मूलभूत सुविधा नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, विश्रांतीसाठी जागा आणि आवश्यक दिशादर्शक फलकांचा अभाव जाणवत आहे. या ऐतिहासिक स्थळाच्या जतन आणि संवर्धनासाठी स्थानिक ग्रामपंचायत, महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभाग आणि पर्यटन मंत्रालयाने तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे, अशी मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे.
आमदार विक्रम पाचपुते यांनी लक्ष घालण्याची मागणी..
श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांनी या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा आणि पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा पर्यटक व शंभुप्रेमी व्यक्त करत आहेत. किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जतन करतानाच तो पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असा विश्वास अभ्यासक व्यक्त करत आहेत.
स्रोत:(अधिकृत माहितीनूसार)




