दिनांक २७ मार्च,पुणे :
बोरिवली येथून श्रीगोंदा येथे रुग्णाला घरी सोडविण्यासाठी घेऊन जात असताना, टोलनाक्यावर वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका अडवली. एका पोलिसाने चालकाच्या वडिलांना काठीने मारहाण केली. यामध्ये मारहाण झालेल्या व्यक्तीचा काही अंतर पुढे गेल्यानंतर मृत्यू झाला. ही घटना आज, शुक्रवारी (दि.२७) दुपारी एकच्या सुमारास उर्से टोलनाक्यावर घडली आहे.
नरेश शिंदे (वय ४९, रा. ठाणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत नरेश यांचा मुलगा निलेश शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. शिंदे यांची रुग्णवाहिका ठाणे सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. ते गुरुवारी रात्री एका रुग्णाला घेऊन बोरिवली येथून श्रीगोंदा येथे निघाले होते.
दुपारी एकच्या सुमारास त्यांची रुग्णवाहिका मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्यावर आली. तिथे थांबलेल्या वाहतूक पोलिसांनी निलेश यांना खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर एका वाहतूक पोलिसाने नरेश यांच्या पाठीत जोरात काठी मारली. तर दुस-या वाहतूक पोलिसाने नरेश यांना तुम्ही प्रवासी घेऊन जात असल्याचे म्हणत एका अधिका-याकडे नेऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्यांना प्रवासी वाहून नेत असल्याचे म्हणत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे निलेश यांनी सांगितले.
त्यानंतर निलेश रुग्णवाहिका घेऊन चाकणच्या दिशेने गेले. चाकणच्या पुढे गेल्यानंतर शारीरिक त्रास होत, नरेश यांनी जीभ बाहेर काढून मान टाकली. वडिलांना त्रास होत असल्याने निलेश यांनी काही रुग्णालयांमध्ये त्यांना दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयांनी दाखल करून घेतले नाही. शेवटी शिक्रापूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे.
लोकडाऊनच्या नावाखाली पोलीस अतिरेक करीत असल्याचे काही ठिकाणच्या घटनांवरून समोर येत आहे.मुळात कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन व प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहेत.मात्र गर्दी चे प्रमाण जे संसर्ग वाढऊ शकते.याला रोखन्याचे पोलिसांचे व स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न स्वागतार्ह आहेत.एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दिलेला सवलतीचा वेळ आणि त्या कालावधीत पोलिसांकरवी साधारण,वयस्कर,महिलांसमोर होणारी कारवाई सामान्य माणसांना संभ्रमात पाडणारी आहे.
पोलिसांच्या अश्या वागणुकी संदर्भात काही सामाजिक संघटना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करणार असल्याचे समजते आहे.
(वृत्तसंस्था)
