दिनांक २ मे २०२६, श्रीगोंदा:
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील सुप्रसिद्ध भागवताचार्य आणि ओम चैतन्य आत्माराम बाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या संचालिका ह.भ.प. विद्याताई महाराज रेपाळे (गांगर्डे) यांच्या आध्यात्मिक कार्याचा गौरव राष्ट्रीय स्तरावर झाला आहे.
त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत ‘भारत न्यूज नेटवर्क’च्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘भारत सन्मान अवॉर्ड २०२६ – सर्वश्रेष्ठ कीर्तनकार’ हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.

विद्याताई महाराज यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. एकीकडे घरसंसार आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत असताना, दुसरीकडे त्यांनी वारकरी संप्रदायाचा वारसा जपत कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य अविरत सुरू ठेवले आहे.

एक आदर्श महिला कीर्तनकार कशी असावी, याचे त्या उत्तम उदाहरण मानल्या जातात. त्यांच्या आवाजातील गोडवा आणि शास्त्राधारित निरुपण यामुळे अल्पावधीतच त्यांनी महाराष्ट्रभर मोठा भक्तवर्ग निर्माण केला आहे.

‘भारत न्यूज नेटवर्क’ने त्यांच्या निवडीचे पत्र देताना विशेष नमूद केले आहे की, विद्याताई महाराजांनी आपल्या कारकिर्दीत नेहमीच समाजहित आणि आध्यात्मिक मूल्यांना प्राधान्य दिले आहे. विशेषतः महिलांना आध्यात्मिक क्षेत्रात व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. याच निस्पृह सेवेचा आणि योगदानाचा विचार करून त्यांची या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

या पुरस्काराची घोषणा होताच श्रीगोंदा आणि आष्टी तालुक्यातील वारकरी संप्रदायामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पारगाव सुद्रिक येथील ग्रामस्थांनी आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी विद्याताईंचे अभिनंदन केले असून, त्यांच्या कार्याचा गौरव केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)














Leave a Reply