अहिल्यानगर, दि. २८ :
सुस्पष्ट दृष्टी, प्रभावी अंमलबजावणी आणि जनसेवेसाठी असलेली कटिबद्धता यांतून साकारलेला ‘अभिप्राय कक्ष’ हा उपक्रम प्रशासनातील पारदर्शकता व उत्तरदायित्व वृद्धिंगत करणारा ठरला आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. जिल्ह्यासाठी ही अत्यंत भूषणावह बाब ठरली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या संकल्पनेतून अहिल्यानगर जिल्ह्यात दि. १ जुलै २०२५ पासून ‘अभिप्राय कक्ष’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. नागरिकांना सेवा देताना पारदर्शकता व उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांतून लाभ घेतलेल्या प्रत्येक नागरिकाशी थेट संपर्क साधून त्यांचा अभिप्राय नोंदविला जातो. प्राप्त अभिप्रायाचा गांभीर्याने विचार करून आवश्यक असलेल्या प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही केली जाते.
या उपक्रमामुळे प्रशासन अधिक सजग, उत्तरदायी व कार्यक्षम बनत आहे. मार्च २०२६ अखेरपर्यंत १ लाख ५० हजार नागरिकांशी थेट संपर्क साधण्यात आला असून, प्राप्त झालेल्या ४९४ तक्रारींपैकी ३३३ तक्रारींचे यशस्वी निराकरण करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांना सेवा अधिक जलद, पारदर्शक व सुलभ पद्धतीने पुरविल्या जात आहेत.
विश्वास, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांचा संगम असलेला ‘अभिप्राय कक्ष’ हा उपक्रम अहिल्यानगर जिल्ह्यात प्रशासकीय कार्यक्षमतेचा नवा मापदंड ठरत आहे. हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही अनुकरणीय आदर्श ठरू शकतो, हेच या राज्यस्तरीय सन्मानातून अधोरेखित होते.













Leave a Reply