दिनांक १७ एप्रिल,श्रीगोंदा:
कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर दिल्ली येथे तबलिकी जमातच्या मरकज येथिल कार्यक्रमावर देशभरातील अनेक चॅनेलने उथळपणे बातम्या प्रसारित केल्या होत्या.यातून समस्त मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात आले होते. या सर्व प्रकरणावर प्रकाश टाकणारा लेख अहमदनगर जिल्ह्यातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते टिळक भोस यांनी मॅक्स महाराष्ट्र या मराठी प्रसारमाध्यमाने प्रसारित केला होता. याचाच राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी दिल्याने दोघा जणांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वृत्त असे की, अहमदनगर जिल्ह्यामध्ये टिळक भोस हे सडेतोड वास्तववादी लेखनासाठी प्रसिद्ध असून,ते पुरोगामी चळवळीमध्ये काम करत आहेत. आत्तापर्यंत अनेक विषयांवर त्यांनी लेख लिहिले असून,पुरोगामी चळवळीची आग्रही भूमिका मांडण्यात ते नेहमी पुढाकार घेत असतात. त्यांनी तबलिक जमात कार्यप्रणाली , दिव्याखाली अंधार व लॉकडाऊन काळात घ्यावयाची काळजी असे लेख लिहून वास्तव जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता.सदर लेख मॅक्स महाराष्ट्र व या मराठी माध्यमाने सर्वत्र प्रसारित केल्याने या लेखावर राज्यभर चर्चा झाली होती.
या लेखाबद्दल हजारोने टिळक भोस यांकडे फोन व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया आल्या होत्या. मात्र, काही सनातनी लोकांना ही वस्तुस्थिती मान्य नसल्याने. तुम्ही तबलीक जमातीविषयी लिहू नका.अन्यथा तुमचे हात पाय तोडून टाकू अथवा जिवंत ठेवणार नाही.अशा धमक्या व्हाटसअपच्या माध्यमातून देण्यात आल्या. त्यामुळे भोस यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांकडे लेखी तक्रार केली होती.त्यावर त्यांनी शहानिशा करून दोन अज्ञात व्यक्तिविरुद्ध भा.दं सं १८६० चे कलम ५०७ नुसार गुन्हा दाखल केला असून,पुढील तपास हे कॉ. पितळे हे करत आहेत.
