एल्गारचा तपास एन.आय.ए.कडे वर्ग..

शरद पवार यांच्यावर कुरघोडी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न..
व्हायरल न्यूज:
दिनांक २५जानेवारी(नवी दिल्ली):
कोरेगाव भीमा येथे 2018 मध्ये झालेल्या हिंसाचाराला एल्गार परिषद कारणीभूत होती, असा ठपका ठेवून या परिषदेच्या आयोजकांवर दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले. शरद पवार यांनी शुक्रवारी सकाळी या प्रकरणाचा तपास विशेष पथकाने करावा, अशी मागणी केल्यानंतर तातडीने सायंकाळी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. यामुळे या प्रश्‍नावरून पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची शक्‍यता आहे.
कोरेगाव भीमा येथे विजय दिनाच्या कार्यक्रमाला येणाऱ्या शेकडो आंबेडकरवादी अनुयायांवर हल्ले करण्यात आले होते.
या प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भीडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र नंतर पोलिसांनी केलेल्या तपासात एल्गार परिषदेतील भडक भाषणांमुळे ही दंगल पेटवल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यात वरवराराव आणि अन्य सात जणांवर शहरी नक्षलवादी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
पा पार्श्‍वभूमीवर या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांवर शरद पवार यांनी ताशेरे ओढले होते. त्यांनी या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपवावा आणि यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी भूमिका घेतली. त्यानंतर केंद्र सरकारच्या गृह खात्याने तातडीने कारवाई करत या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला.
एनआयएकडे दहशतवादी घटना आणि देशाविरूध्द पुकारलेलेल युध्द अशा सारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास असतो. त्यांच्याकडे हा तपास दिल्याबद्दल राज्यातील सत्ताधारी पक्षाकडून संताप व्यक्त होत आहे. या तपासातील खोटेपणा उघड पडू नये म्हणून केंद्र सरकारने हा तपास आपल्याकडे ठेवला असल्याची टीका वंचित बहुजन आघडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading