देवदैठण (ता. श्रीगोंदा)-पाडळी (ता. पारनेर) रस्त्यावर पडलेल्या खड्यांबाबत स्थानिक प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही काहीच उपयोग होत नसल्याने, देवदैठण येथील ग्रामस्थांनी सोमवारी दिनांक १० फेब्रुवारी सकाळी रक्तदान करून,या मागणीसाठी अनोखे आंदोलन केले.
देवदैठण व पाडळी रांजणगाव या दोन गावांना जोडणा-या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झाली असून,दुरुस्तीसाठी त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.पीडितांना आश्वासना शिवाय काहीच मिळाले नाही.यासाठी देवदैठणच्या ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन करण्याचे ठरविले. त्यानुसार,सोमवारी सकाळी ३० तरुणांनी रक्तदान करीत प्रशासनाचे लक्ष वेधले. अशा आंदोलनानंतरही प्रशासन ऐकणार नसेल तर २० फेब्रुवारीपासून रास्ता रोको, बेमुदत उपोषण आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
विश्वास गुंजाळ,वसंत बनकर,निलेश गायकवाड, विजय कोकाटे,रवींद्र ढवळे,संतोष वेताळ,सुरेश उबाळे आदींसह गावक-यांनी रक्तदान करून आंदोलनात सहभाग नोंदविला.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र वाखारे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.
देवदैठण ग्रामस्थांचे निवेदन मिळाले असून, या रस्त्यासाठी विशेष लक्ष घालून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ग्रामस्थांनी संयम राखावा,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती काशिनाथ दाते यांनी आंदोलकांना सांगितले. अनेक वर्षापासूनची आमची रस्ता डांबरीकरणाची मागणी आहे. राजकीय नेते, प्रशासनाकडून नुसतेच आश्वासन मिळते.या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर लक्ष घातले नाही?तर तीव्र आंदोलन छेडू. असा इशारा देवदैठणच्या उपसरपंच जयश्री गुंजाळ,पूजा बनकर यांनी यावेळी दिला आहे.