दिनांक ३१ जानेवारी २०२६ श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरालगत असलेल्या पेडगाव रोडवरील प्रसिद्ध ‘महाराजा मच्छी कॉर्नर’चे मालक संजू सदाशिव उदमले यांनी एका सामाजिक पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गंभीर आरोप केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
एका जबाबदार संघटनेच्या पदाधिकाऱ्याने ५० हजार रुपयांची मागणी करत आपल्याला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा दावा संजू उदमले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
संजू उदमले यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पदाधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना विनाकारण त्रास देत आहे. “तुमच्या हॉटेलमध्ये अनधिकृत व्यवसाय सुरू आहे, तो सुरू ठेवायचा असेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील,” अशी धमकी या पदाधिकाऱ्याने दिली आहे.

मात्र, संजू उदमले यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, आपण केवळ मागासवर्गीय असल्याने आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले आहे.
पेडगाव रोडवर संजू उदमले आणि त्यांचा मुलगा रोहन उदमले हे ‘महाराजा मच्छी कॉर्नर’च्या माध्यमातून ग्राहकांना स्वादिष्ट जेवण देण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहेत. मात्र, या बेगडी समाजसेवकांकडून हॉटेलची बदनामी केली जात असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.
“या अपप्रचारामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून, शहरात नावलौकिक असलेल्या हॉटेलची प्रतिमा मलीन होत आहे,” अशी खंत संजू उदमले यांनी व्यक्त केली.
यापूर्वीही काही दंगाखोरांनी हॉटेलवर येऊन कर्मचारी आणि मालकांना मारहाण केली होती, ज्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध आहे.

केवळ मागासवर्गीय असल्याने वारंवार दमदाटी आणि छळ केला जात आहे. संबंधित बेगडी पदाधिकाऱ्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Atrocity Act) गुन्हा दाखल करावा.
न्याय न मिळाल्यास श्रीगोंदा पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयासमोर लवकरच आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा संजू उदमले यांनी दिला आहे.
या गंभीर आरोपामुळे श्रीगोंद्यातील सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, आता पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
