दिनांक १० मार्च २०२६, श्रीगोंदा:
मौजे ढोरजे (ता.श्रीगोंदा) येथील जमीन खरेदीच्या व्यवहारावरून जाणीवपूर्वक बदनामी केली जात असून, खोट्या केसेस दाखल करण्याची भीती दाखवून दबाव टाकला जात असल्याचा खळबळजनक खुलासा कोळगाव येथील हेमंत भास्करराव नलगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

हेमंत नलगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे ढोरजे येथील गट नं. २४६ मधील २.६७ हे. आर. ही वडीलोपार्जित जमीन त्यांनी २ जानेवारी २०२५ रोजी त्यांची पत्नी सौ. संध्या हेमंत नलगे यांच्या नावावर रीतसर खरेदीखताने (क्र. ५१/२०२५) विकत घेतली आहे.
सदर जमीन श्री. अरविंद मधुकर गायकवाड, हेमलता तबाजी आढाव, सुरेश मधुकर गायकवाड यांच्यासह एकूण ८ जणांकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून खरेदी करण्यात आली आहे.

या व्यवहाराची रीतसर नोंद फेरफार क्रमांक ३३८० अन्वये १४ जानेवारी २०२६ रोजी झाली असून, मूळ मालकांनी जमिनीचा ताबाही प्रत्यक्ष जागेवर येऊन दिला आहे. सध्या या जमिनीची मशागत नलगे कुटुंबियांकडूनच केली जात आहे.
नलगे यांनी पत्रकात नमूद केले आहे की, “वत्सला भोईटे, त्यांची मुले आणि नातेवाईक सुषमा सोनवणे व रणसिंग यांनी माझा मुलगा ऋषिकेश याच्याशी संपर्क साधून माझी भेट घेतली होती.

कोळगाव येथील कांडेकर लॉन्स येथे आमची बैठक झाली. यावेळी त्यांनी सदर जमीन त्यांना विकण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी दिलेली किंमत ही बाजारभावापेक्षा अत्यंत कमी असल्याने आमचा व्यवहार होऊ शकला नाही.”
जमीन खरेदीचा व्यवहार न जुळल्याचा राग मनात धरून संबंधितांकडून आपली व पत्नीची बदनामी केली जात असल्याचा आरोप नलगे यांनी केला आहे.

“यापूर्वीही यांनी इतर काही सहकाऱ्यांवर खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे.
आता आमच्यावरही दबाव टाकण्यासाठी खोट्या तक्रारींचा आधार घेतला जात आहे. आमचा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर असून वत्सला भोईटे यांनी केलेले दावे पूर्णपणे खोटे आहेत,” असेही नलगे यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रसिद्धीपत्रकाद्वारे हेमंत नलगे यांनी सत्य परिस्थिती समोर मांडली असून, जमीन वर्ग एक असल्याने चालू बाजार भाव मध्ये खरेदी करण्यात आली. त्यामुळे कोणाच्याही फसवणुकीचा विषय नाही. अर्थात कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे..
स्रोत:(हेमंत नलगे यांचे प्रसिद्धी पत्र)
