दिनांक १९ मार्च २०२६ श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहर आणि तालुक्यात सध्या एका ‘दादा’ आणि ‘भैय्या’च्या जोडीची जोरदार चर्चा सुरू आहे. अनधिकृत आणि अवैध व्यवसायांकडून गोळा केला जाणारा हप्ता नेमका कोणाच्या खिशात जातोय? आणि हे ‘दादा’ नेमके कोणाचे ‘वैभव’ वाढवण्यासाठी पोलिसांकडून वसुली करत आहेत? या प्रश्नांनी सध्या संपूर्ण तालुक्यातील वर्तुळात धुमाकूळ घातला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण असल्याचे दाखवले जाते. मात्र, वास्तवात या धंद्यांकडून होणारी वसुली थेट वरच्या पातळीवर एका बड्या ‘भैय्या’कडे पाठवली जात असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, पोलिसांकडून हे पैसे गोळा करण्याचे काम तालुक्यातीलच या ‘दादां’कडे सोपवण्यात आले आहे. हे ‘दादा’ बंद दाराआड पोलिसांकडून हिशोब घेतात आणि तो वरपर्यंत पोहोचवतात, अशी चर्चा कोनाकोपऱ्यात रंगली आहे.
तालुक्यातील अवैध धंद्यांवर सध्या एका विशिष्ट ‘भैय्या’चे पूर्णपणे नियंत्रण असल्याचे समजते. त्यांच्या संमतीशिवाय एकही अनधिकृत धंदा चालू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या धंद्यांकडून मिळणारा मलिदा थेट भैय्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या ‘दादां’च्या कार्यपद्धतीमुळे जनसामान्यांत संताप व्यक्त होत आहे. सतत ‘तोंड चालू असलेल्या’ या ‘गु… ट… खाऊ दादां’चा प्रताप आता चव्हाट्यावर आला असून, त्यांच्या माध्यमातूनच ‘भैय्या’चे आर्थिक साम्राज्य फोफावत असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.
अवैध धंद्यांच्या आडोशाला राहून वसुली करणाऱ्या पोलिसांकडूनही वसुली करणारे हे वैभव संपन्न ‘दादा’ कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या वसुली गँगमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत असून, श्रीगोंद्याच्या शांततेला सुरुंग लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
अवैध धंद्यांच्या पैशातून कोणाचे ‘वैभव’ उजळत आहे.? या ‘दादां’चा खरा चेहरा जनतेसमोर कधी येणार? आणि प्रशासन या ‘वरच्या परम प्रतापी भैय्या’वर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का.?
या चर्चेतील वास्तव लवकरच समोर येईल अशी चिन्हे आहेत. मात्र, या वसुली पॅटर्नमुळे श्रीगोंदा तालुक्यात सध्या भीती आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती नुसार)
