दिनांक ९ एप्रिल २०२४ (श्रीगोंदा),(जावेद इनामदार):
श्रीगोंदा तालुक्यामध्ये वन क्षेत्र असुन त्यामध्ये विविध वन्यप्राणी तसेच पक्षांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक तसेच, कृत्रिम उद्भव कोरडे पडले आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांची पाण्या अभावी होरपळ होत आहे.
पाण्याच्या शोधात वन्यजीव नागरी वस्तीमध्ये प्रवेश करित असून, यामध्ये हिंस्र श्वापदे सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीमध्ये घुसत आहेत. तसेच, काही ठिकाणी रस्त्यावर देखील फिरत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, पाणी उपलब्ध नसल्याचे वन्य प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून श्रीगोंद्यातील सामजिक कार्यकर्ते व वकील मित्र यांनी एकत्र येऊन वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणेबाबत श्रीगोंदा वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती भगत मॅडम यांना निवेदन दिले.
निवेदन देते वेळी सामजिक कार्यकर्ते गणेश औरंगे, ॲड. गोरख कडूस पाटील, ॲड. अक्षय मखरे, ॲड. सचिन कोरडकर, ॲड. गणेश खेतमाळीस, ॲड. विशाल इथापे, ॲड. गणेश दातीर, ओंकार अनारसे, राहुल राहिंज आदी उपस्थित होते.
यावेळी भगत मॅडम यांनी वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणेबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले व या कामात सुजाण नागरिक, सामजिक संघटना यांनी देखील आवश्यक ते सहकार्य करुन पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
