बिबट्यांच्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा नियोजनातून ८ कोटी १३ लाखांचा निधी – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील..

दिनांक १४ नोव्हेंबर २०२५,अहिल्यानगर:

जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन व विकास समितीतून ८ कोटी १३ लाख ४४ हजार रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

बिबट्यांच्या वाढत्या हालचालींचा विचार करून पालकमंत्र्यांनी मागील दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी व वन विभागाशी सतत संपर्क ठेवत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यास आवश्यक अतिरिक्त यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याबाबत सूचित केले.

उपलब्ध निधीतून ३०० पिंजरे, ३०० ट्रॅप कॅमेरे, तसेच जॅकेट, शूज, टॉर्च गन्स आणि संरक्षणात्मक किट यांसारखी रेस्क्यू उपकरणे खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय २२ रेस्क्यू वाहने तातडीने खरेदी करण्यासही प्रशासनास सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात ११५० बिबटे असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यास सांगितले असून पकडलेले बिबटे वनतारा येथे स्थलांतरित करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यवाहीची अंमलबजावणी त्वरित करण्याचे निर्देशही देण्यात आले.

तालुकानिहाय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशासूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असेही पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.


स्रोत:(जिल्हा माहिती अधिकारी)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading