दिनांक २३ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:
विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या स्थित्यंतरानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या परिस्थितीत माजी आमदार राहुल जगताप यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. माध्यमांशी बोलताना जगताप यांनी सांगितले की, “आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून सौ अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्यात आली, ज्यामध्ये आमच्या कार्याचा योग्य तो सन्मान झाला नाही.”
जगताप यांनी ठाकरे गटातील नेत्यावर टीका करताना सांगितले की, “शिवसेना खासदार संजय राऊत यांनी श्रीगोंदा येथील जागेसाठी फारच आग्रह धरला. नगर शहरात शिवसेनेची बलाढ्य जागा असताना, ती जागा घेण्याऐवजी राऊत यांनी श्रीगोंदा येथील जागा विकली.”
ते पुढे म्हणाले, “विरोधी पक्षातील उमेदवाराला पक्ष प्रवेश करण्याआधीच उमेदवारी जाहीर केली जाते. हे सर्व पाहून राऊत यांनी ही जागा विकली असे दिसते.” जगताप यांनी या आरोपांसोबतच पक्षांतर आणि उमेदवारीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
त्यांनी सांगितले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही ३३ हजार मतांच्या लीडने निलेश लंके यांना विजयी करण्याचे काम केले होते. तसेच श्रीगोंदा तालुक्यातील बहुतेक संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना आमच्या कार्याचा योग्य तो विचार न करता आम्हाला डावलून उमेदवारी देण्यात आली, असेही ते म्हणाले.
जगताप यांनी आश्वासन दिले की, “सर्वसामान्य माणसांच्या आशीर्वादाने श्रीगोंदा तालुक्यात परत एकदा चांगला पॅटर्न उभा केला जाईल.”
स्रोत:(अधीकृत माहितीनुसार)





