दिनांक ७ मार्च २०२६, श्रीगोंदा:
अध्यात्म आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेल्या श्री संत शेख महंमद बाबा यांच्या यात्रा उत्सवात एका खळबळजनक घटनेने शहराचे लक्ष वेधून घेतले आहे.
यात्रेनिमित्त आलेल्या एका गरीब पाळणा चालकास विना तिकीट बसू न दिल्याच्या रागातून एका ‘भुरट्या’ अधिकाऱ्याने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या घटनेमुळे श्रीगोंदा शहर आणि तालुक्यात संबंधित अधिकाऱ्याच्या मुजोरपणाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
दिनांक २७ व २८ फेब्रुवारी रोजी श्री संत शेख महंमद बाबा यांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्रीगोंदा पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त तैनात केला होता.

याकामी ‘संघर्ष पोलीस मित्र संघटनेच्या’ पदाधिकाऱ्यांनीही मोलाची साथ दिल्याने कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही मोठा प्रश्न उद्भवला नाही.
मात्र, या उत्साहाच्या वातावरणात एका ‘भुरट्या’ अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करत पाळण्यात विना तिकीट फुकट बसण्याचा हट्ट धरला.

पाळणा चालकाने तिकीट मागितले असता, स्वतःला मोठे समजणाऱ्या या अधिकाऱ्याचा अहंकार दुखावला गेला. त्यातूनच त्याने गरीब पाळणा चालकाला दमदाटी करत मारहाण केली.
पोटाची खळगी भरण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून तसेच परराज्यातून आलेले हे पाळणा चालक अत्यंत गरीब व भटके विमुक्त समाजातील आहेत.

वर्षभर कष्ट करून यात्रेच्या दिवसांत चार पैसे कमवण्याची त्यांची अपेक्षा असते. अशा कष्टकऱ्यांवर केवळ फुकट बसू दिले नाही म्हणून हात उचलणे हे अत्यंत निंदनीय असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

या घटनेमुळे प्रशासन आणि संबंधित विभागाच्या प्रतिमेला धक्का बसला असून, या प्रवृत्तीचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी भावना श्रीगोंदावासीयांकडून व्यक्त होत आहे.
“आपल्या अधिकाराचा वापर जनतेच्या सेवेसाठी करण्याऐवजी, गरीब कष्टकऱ्यांवर दादागिरी करण्यासाठी करणाऱ्या अशा ‘भुरट्या’ अधिकाऱ्यावर कडक कारवाई व्हायला हवी,” अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
