या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात केडगाव आणि श्रीगोंदा येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निपाणी बडगाव येथील संदीप राऊत यांचे श्रीरामपूरमध्ये ‘सेतू’ केंद्र आहे. त्यांच्या केंद्रात परिसरातील ४० शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज केले होते.
यावेळी आरोपींनी आपण सोलर कंपनीचे सब-डीलर असल्याचे सांगून राऊत यांचा विश्वास संपादन केला. शेतकऱ्यांना लवकर पंप मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांनी ५ लाख ४७ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले.
राऊत यांनी शेतकऱ्यांकडून गोळा केलेली ही रक्कम रोख आणि ऑनलाईन स्वरूपात आरोपींना सुपूर्द केली. मात्र, फेब्रुवारी २०२५ उजाडूनही एकाही शेतकऱ्याच्या शेतात सौर पंप बसवण्यात आला नाही.
पंप बसवण्यास विलंब होत असल्याने संदीप राऊत यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, आरोपींनी नवीन अर्जदार शेतकऱ्यांच्या नावांसमोर आधीच सौर पंप घेतलेल्या जुन्या शेतकऱ्यांचे ग्राहक क्रमांक (Customer Numbers) ऑनलाईन पोर्टलवर टाकले होते.
अशा प्रकारे आरोपींनी केवळ शेतकऱ्यांचीच नव्हे, तर ‘महावितरण’ कंपनीचीही तांत्रिक फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संदीप राऊत यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी खालील संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. १. ओंकारेश्वर रासकर (रा. केडगाव, अहिल्यानगर) २. किरण बोरुडे (रा. केडगाव, अहिल्यानगर) ३. संदीप बनकर (रा. श्रीगोंदा)