दिनांक २६ मार्च,नवी दिल्ली:
देशभरातील लॉकडाऊनमुळे गरिब जनतेचे हाल होत असल्याने त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने १.७० कोटी रुपयांच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजनुसार, देशातील ८० कोटी गरीब जनतेला पुढील तीन महिन्यांसाठी अतिरिक्त पाच किलो गहू किंवा तांदूळ तसेच १ किलो डाळ मोफत मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी याची पत्रकार परिषदेत घोषणा केली.
सीतारामन म्हणाल्या, देशातील ८० कोटी गरिब जनतेला जी देशाच्या दोन तृतीयांश आहे. त्यांना सध्या प्रत्येक व्यक्तीसाठी ५ किलो गहू किंवा तांदूळ मिळतो आहे. यामध्ये आता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत पुढील तीन महिन्यांसाठी अतिरिक्त ५ किलो गहू किंवा तांदूळ तसेच १ किलो डाळ यांचे मोफत वाटप केले जाणार आहे.विविध राज्यांमधून ज्या प्रकारे डाळीबाबत मागणी असेल तिथेच मोफत डाळीचे वाटप केले जाणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा आरोग्य विमा
दरम्यान, करोनाशी लढण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पुढील तीन महिन्यांसाठी प्रत्येकी ५० लाखांच्या आरोग्य विम्याची घोषणा यावेळी सीतारामन यांनी केली. याकाळात करोनावर नियंत्रण मिळवण्यात आपल्याला यश येईल, अशी आशाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
(वृत्तसंस्था)
