दिनांक २१ जुलै २०२४, कोळगाव, श्रीगोंदा:
कोळगाव परिसरामध्ये आषाढी पौर्णिमेला परिसरातील लक्ष्मी देवीच्या मंदिरापासून संपूर्ण गावाला वेढा पूर्ण करून लक्ष्मी देवीची साथ म्हणजेच मिरवणूक गावाबाहेरून काढली जाते. यामध्ये गावातील सर्व अठरापगड जातीचे व बारा बलुतेदार तसेच सर्व जाती-जमातीतील स्त्री पुरुष, लहान थोर मंडळी एकत्र येऊन गावामध्ये सुख शांती नांदण्यासाठी व सर्वांना चांगले आरोग्य लाभण्यासाठी लक्ष्मी आई देवीची मिरवणूकी मध्ये सहभागी झाले होते. ही मिरवणूक वाजत गाजत व लक्ष्मी आईच्या नावाने घोषणा देत संपन्न झाली.
शेकडो वर्षापासून कोळगाव मध्ये लक्ष्मी देवीची साथ म्हणजेच मिरवणूक काढतात यामागे उद्देश असतो की, गावांमधील अनिष्ट शक्तींचा प्रभाव नष्ट होऊन रोगराईचे वातावरण नष्ट व्हावे, सर्वांना चांगले आरोग्य मिळावे व सर्वजण सुखात नांदावेत या कारणासाठी ही मिरवणूक काढली जाते. यामध्ये लक्ष्मी देवीचे भक्तगण, पोतराज, देवीच्या भक्तगण महिला, यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. ही साथीची मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
या साथीच्या मिरवणुकीमध्ये गावातील काही विशिष्ट ठिकाणी ज्यांच्या डोक्यावर गाडगे धरलेले असते ती व्यक्ती खुंटली जाते. म्हणजेच जागेवरून हलू शकत नाही. अशावेळी १५ ते २० जण त्या व्यक्तीला त्या जागेपासून दूर करण्याचा प्रयत्न करतात तरीसुद्धा ती व्यक्ती जागेवरून हलत नाही. अशावेळी भाविक मंडळी अंडी, लिंबू, चुरमुरे, भात, दही अशाप्रकारे चे अन्नपदार्थ ओवाळून टाकतात त्यानंतर ती व्यक्ती पुढे जाते. हा प्रकार पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांची गर्दी जमा होत असते.
पूर्वीच्या काळी शेतातील पेरणी पूर्ण करून भाविक लोक आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला वारीमध्ये समाविष्ट होत होते. त्याकाळी पुरेशा आरोग्याच्या सोयी उपलब्ध नसल्याने पंढरपूर वरून माघारी येथे वेळी ही मंडळी आपल्या समवेत साथीचे आजार घेऊन येत होते. त्या लोकांना गावाच्या वेशी बाहेर काही दिवस थांबवून नंतर गावाच्या बाहेरून त्यांची मिरवणूक काढून त्यांना गावात प्रवेश दिला जात असे.. यालाच साथ असे म्हटले जाते. त्यामुळे त्यांच्या समवेत आलेले साथीचे रोग गावामध्ये शिरत नव्हते. या साथीच्या रोगांना अटकाव करण्यासाठी व भाविकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी व गावामध्ये त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावागावातून सात म्हणजेच मिरवणूक सवाद्य काढतात असे तार्किक कारण ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.
स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)






