दिनांक ८ जुलै २०२४,अहमदनगर:
जिल्ह्यात ८ व ९ जुलै रोजी विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा.. नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन..
भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात ८ व ९ जुलै २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. हवामानाच्या इशाऱ्यानुसार नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या प्रसिध्दी पत्रकानुसार, मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान आणि विजा चमकत असताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यापासून दूर राहावे. मोकळ्या मैदानात, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या किंवा लोंबणाऱ्या केबल्सपासून दूर रहावे.
अतिवृष्टीमुळे भूस्खलन आणि दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी आणि वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये चढू अथवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. नागरिकांनी वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी.
आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१-२३२३८४४ वा २३५६९४० वर संपर्क साधावा, असे आवाहनही प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)






