दिनांक १५ मार्च २०२५, श्रीगोंदा:
तालुक्यातील दाणेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी एका विहिरीत विनाशीर अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली होती. सुरुवातीला फक्त धड मिळाल्याने पोलीस तपासाची मोठी अडचण झाली होती. मात्र आज त्या विहिरीच्या जवळच असलेल्या दुसऱ्या विहिरीत मृताचे शीर, दोन हात आणि पाय सापडले.

मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने कसून तपास केला. शेवटी मृताच्या कानातील काळ्या बाळीवरून त्याची ओळख पटली. हा मृतदेह माऊली सतीश गव्हाणे (वय १९ वर्षे) याचा असल्याचे त्याच्या चुलत्याने सांगितले.

या घटनेबाबत अहमदनगर आणि पुणे पोलीस सक्रिय तपास करत आहेत. मात्र, अजूनही या हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात तपास अधिकारी मारुती कोळपे म्हणाले, “ही घटना अजूनही गुलदस्त्यात आहे. मृताच्या ओळखीचा तपास लागला असला, तरी खून नेमका कोणत्या कारणावरून झाला..? हे अद्याप समजू शकलेले नाही.”

माऊली गव्हाणेचा काही दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये काही मुलांसोबत वाद झाला होता, त्यामुळे त्या दिशेनेही चौकशी सुरू आहे. पोलिसांनी संशयित मुलांचे जबाब नोंदवले असले तरी त्यांच्याकडून विशेष माहिती समोर आलेली नाही.

माऊलीची अशी निर्घृण हत्या का आणि कोणी केली.? तो विखुरलेला मृतदेह वेगवेगळ्या विहिरींमध्ये का टाकण्यात आला.? हे सर्व प्रश्न अनुत्तरितच आहेत. घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून लवकरच सत्य समोर येण्याची शक्यता आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Advertise..
