दिनांक १ ऑक्टोबर २०२५,श्रीगोंदा:
तालुक्यातील ढोरजा येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मळणी यंत्राला वीजेचा जोरदार धक्का लागून विवेक कारंडे नावाचा एक नवविवाहित तरुण शेतकरी जागीच ठार झाला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे.

मागील काही दिवसांत ‘वरुण राजा’ने दमदार हजेरी लावल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके पाण्यामुळे कुजून जाण्याच्या मार्गावर होती. अशा परिस्थितीत, हातातोंडाशी आलेली बाजरीचे पीक वाचवून ते पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी अथक प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून, ढोरजा येथील विवेक कारंडे हे आपले वाचलेले बाजरीचे पीक मळणी यंत्राने काढून घेण्यासाठी शेतात गेले होते.

मळणी यंत्राची मोटर चालू करण्यासाठी त्यांनी विजेचा आकडा जोडला. मात्र, मळणी यंत्राची मोटार खराब असल्याने संपूर्ण यंत्रात करंट उतरला. हा जोरदार वीजेचा धक्का बसल्याने विवेक कारंडे यांचा जागीच मृत्यू झाला.

विवेक कारंडे हे नवविवाहित असल्याची माहिती गावकऱ्यांकडून मिळत आहे, त्यामुळे या घटनेमुळे संपूर्ण ढोरजा परिसरात आणि तालुक्यात शोककळा पसरली आहे. शेतकऱ्यांच्या जीवघेण्या संघर्षात असा दुर्दैवी अंत झाल्याने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)

Advertise..
