दिनांक ६ फेब्रुवारी २०२६, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील नगर रोड (पारगाव मार्गे) येथील रस्त्याचे काम मागील दीड महिन्यांपासून रखडल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. संथ गतीने सुरू असलेल्या या कामामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून, रस्ता त्वरित पूर्ण न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते बिभीषण जाधव यांनी दिला आहे.
श्रीगोंदा शहराला जोडणारे सर्व प्रमुख रस्ते ‘हम’ (HAAM) योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण पद्धतीने विकसित केले जात आहेत. यामध्ये पारगाव बाजूने शहरात येणाऱ्या नगर रस्त्याचाही समावेश आहे.

मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे या रस्त्याची एक बाजू दीड महिन्यापूर्वी उकरून ठेवण्यात आली आहे. कामात कोणतीही प्रगती नसल्याने हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे.
रस्त्याचे उत्खनन करून ते तसेच सोडून दिल्यामुळे खालील समस्या गंभीर बनल्या आहेत. वाहनांच्या वर्दळीमुळे उडणाऱ्या धुळीने स्थानिक रहिवासी आणि दुकानदारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदारांच्या मालावर धूळ बसत असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

रस्त्याची एकच बाजू सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.विशेष म्हणजे, श्रीगोंद्याचे ग्रामदैवत श्री संत शेख महंमद महाराज यांचा यात्रा उत्सव अवघ्या १५ दिवसांवर आला असतानाही रस्त्याची ही दुरवस्था कायम असल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या उखडलेल्या रस्त्यावरून चालणे जिकिरीचे झाले आहे.
त्या बरोबरच कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता संबंधित कंत्राटदाराने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
“रस्त्याचे काम रखडल्याने नागरिक आणि प्रवाशांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन काम त्वरित सुरू करावे, अन्यथा जनहितासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
— बिभीषण जाधव (सामाजिक कार्यकर्ते)
