दिनांक १७ फेब्रुवारी २०२६, श्रीगोंदा:
राष्ट्रसंत शेख महंमद महाराज यांच्या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, यात्रेकरूंची होणारी आर्थिक लूट आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. “विनापरवाना पाळणे लावून भाविकांची लूट थांबवा, अन्यथा २० फेब्रुवारीला तहसील कार्यालयासमोर आंदोलन करू,” असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
या संदर्भात संभाजी ब्रिगेडने श्रीगोंदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पुष्पा भगत आणि नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस यांना निवेदन दिले. २७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या यात्रेसाठी प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन पाळणा दर निश्चित करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पाळणा चालकांनी अवास्तव तिकीट दर आकारू नयेत यासाठी प्रशासनाने माफक दर ठरवून द्यावेत., पाळणा चालकांसाठी ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ बंधनकारक करावे. तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची व्यवस्था तैनात असावी.,
नगरपरिषदेच्या जागांवर दलालांनी केलेले अतिक्रमण हटवून, पाळण्यांसाठी नगरपरिषदेने स्वतः आरेखन करून जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून महसूल शासनाला मिळेल.
विनापरवाना आणि बिगरशेती (NA) नसलेल्या जागेवर पाळणे लावल्यास संबंधित जागा मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
“विनापरवाना पाळण्यांमुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सामान्य भाविकांचे हित जोपासावे.”
— संभाजी ब्रिगेड, श्रीगोंदा
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राऊत, तालुकाध्यक्ष शाम जरे, उपाध्यक्ष दिलीप लबडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
जर प्रशासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही, तर शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

