दिनांक २८ नोव्हेंबर २०२५, श्रीगोंदा, अहिल्यानगर:
तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील नहेरमळा कोळगाव येथे एका धक्कादायक घटनेत आईनेच आपल्या पोटच्या मुलाला विहिरीत फेकून ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलिसांनी आरोपी आईविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नहेरमळा कोळगाव येथील सोनाली योगेश दळवी (रा. नहेरमळा कोळगाव, ता. श्रीगोंदा) या महिलेने तिचा मुलगा कार्तिक योगेश दळवी याला रागाच्या भरात विहिरीच्या पाण्यात टाकून जीवे ठार केले.
दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास नहेरमळा कोळगाव, ता. श्रीगोंदा येथे ही घटना घडली.

या प्रकरणी मुलाचे वडील योगेश सुदाम दळवी यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी सोनाली दळवी हिने मुलगा कार्तिक झोळीत झोपलेला असताना त्याला बाहेर काढले. त्यानंतर त्याला ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून आणले आणि रागाच्या भरात शेतातील विहिरीच्या पाण्यात टाकून ठार मारले.
बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खुनाचा गुन्हा) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रभारी अधिकारी स.पो.नि. सोनवलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. कबाडी सो. आणि पोलीस उपाधीक्षक लोखंडे सो. यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सध्या गावात शांतता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मुलाला ठार मारण्यामागचे नेमके कारण काय होते, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
स्रोत:(फिर्याद)
