दिनांक १७ जानेवारी २०२६,श्रीगोंदा:
तालुक्यातील आढळगाव येथे दुचाकीच्या कारणावरून झालेल्या एका क्षुल्लक वादाचे रूपांतर भीषण रक्तरंजित घटनेत झाले आहे. या वादातून १० ते १५ जणांच्या जमावाने केलेल्या हल्ल्यात एका प्रौढाचा मृत्यू झाला असून, त्यांचा तरुण मुलगा अद्याप बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी आढळगाव येथे दोन तरुणांमध्ये दुचाकी गाडीच्या कारणावरून संवाद सुरू होता. आपला मित्र दुचाकीबद्दल बोलत असताना एका तिसऱ्या व्यक्तीने त्या संभाषणात विनाकारण हस्तक्षेप केला. “आमच्यात का बोलतो? आमचा वेगळा विषय सुरू आहे,” असे विचारल्याच्या रागातून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी समोरच्या व्यक्तीने “तुला बघून घेतो, तुझा काटाच काढतो,” अशी उघड धमकी दिली होती.

दुपारच्या वादाचा वचपा काढण्यासाठी संबंधित इसमाने रात्रीच्या वेळी १० ते १५ जणांचा जमाव गोळा केला आणि तो पीडित तरुणाच्या कोकणगाव येथील घरी पोहोचला. गावात वीज नसल्याचा फायदा घेत या टोळक्याने बस थांब्यावर गाड्या लावून तरुणाच्या घरावर हल्ला चढवला.
सुरुवातीला चार जणांनी तरुणाला मारहाण केली. मात्र, जमावातील इतर लोकांकडे धारदार शस्त्रे असल्याचे पाहून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तरुण आणि त्याचे वडील दोघेही घराबाहेर पळाले. यावेळी त्यांनी घरातील महिला व मुलांना सुरक्षितरीत्या घरात कोंडून घेतले होते.
पळत असताना दुर्दैवाने वडिलांचा पाय घुशीने पोखरलेल्या जमिनीत अडकून ते खाली पडले. याच संधीचा फायदा घेत पाठलाग करणाऱ्या हल्लेखोरांपैकी एकाने त्यांच्या छातीत धारदार शस्त्राने आरपार वार केले. या भीषण हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

जखमी वडिलांना तातडीने पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते, मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दुसरीकडे, या हल्ल्यानंतर पीडित मुलगा रात्रीपासून बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे आणि पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)
