दिनांक २४ जुलै,श्रीगोंदा:
खांडवी येथे दि. २४ मे २०२० रोजी सकाळी आठ वाजता काकासाहेब मच्छिंद्र तापकीर आणि धनंजय मच्छिंद्र तापकीर या दोन भावांसह त्या दोघांच्या पत्नींवर अकरा आरोपींनी खुनी हल्ला केला होता. या हल्ल्यात काकासाहेब मच्छिंद्र तापकीर यांचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला.
दि. २५ मे रोजी अकरा आरोपींवर भा.दं.वि. कलम ३०२, ३०७, ३४१, ३२४, १४३, १४७ आदि अकरा कलमाखाली कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल करून, हे सर्व आरोपी अटक केले. आज दिनांक २४ जुलै २०२० रोजी (१) दिलीप एकनाथ तापकीर (२) मोहन दगडू तापकीर (३) किरण पोपट तापकीर (४) पोपट दगडू तापकीर व (५) राघू दगडू तापकीर या पांच आरोपींचा जामिनाचा अर्ज श्रीगोंदा येथील सत्र न्यायालयापुढे सादर करण्यात आला होता.
सत्र न्यायाधीश न्या. एन. जी. शुक्ला यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. फिर्यादी धनंजय मच्छिंद्र तापकीर यांच्या बाजूने सरकारी वकील ॲड. केदार केसकर यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, संपूर्ण खांडवी गावावर या आरोपींची दहशत आहे. त्यांचा जामीन झाला तर, फिर्यादीच्या कुटुंबाला धोका आहे. म्हणून त्यांना जामीन देण्यात येऊ नये.
आरोपिंच्या वतीने ॲड. एस. एस. शर्मा आणि ॲड. बी. एस. खराडे यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, या पाच आरोपी मध्ये काही आरोपी वयस्कर आहेत, काही दूरचे आरोपी आहेत. तर काहींचा गुन्ह्यात संबंध नाही. म्हणून त्यांचा जामीन मंजूर करावा.
ॲड. केसकर यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील काही केसेसची सायटेशन न्यायाधीशांच्या निदर्शनास आणली. त्यानंतर न्यायमूर्ती एन. जी. शुक्ला यांनी पांचही आरोपींचा जामीन फेटाळला.
सरकारी वकील ॲड. केदार केसकर यांना पोलीस उपाधिक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व पैरवी अधिकारी नाना दरेकर यांनी सहकार्य केले.
स्रोत:(प्रा. तुकाराम दरेकर यांच्याकडुन मिळालेली माहिती)
