दिनांक २६ सप्टेंबर २०२५, पुणे:
सिस्पे (Sispe) आणि इन्फिनिटी बिगन (Infinity Began) यांसारख्या कंपन्यांच्या मोठ्या परताव्याच्या अमिषाला बळी पडून गुंतवणूक केलेल्या अनेक नागरिकांचे कोट्यवधी रुपये बुडाल्याची गंभीर समस्या समोर आलीच आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून या कंपन्यांच्या गैरकारभाराची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. या कंपन्यांनी केलेल्या फसवणुकीविरोधात विधिमंडळातही अनेक आमदारांनी आवाज उठवला आहे, तरीही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरत आहे.

याच नैराश्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. श्याम चव्हाण नावाच्या एका इसमाने आपले २२ लाख रुपये या कंपन्यांत बुडाल्याने टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली आहे. श्याम चव्हाण हे कामाच्या निमित्ताने कुटुंबासह पुण्यात वास्तव्यास होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी दोन दिवसांपूर्वी दापोडी परिसरात फाशी घेऊन आपले जीवन संपवले.
सिस्पे आणि इन्फिनिटी या कंपन्यांनी त्यांचे सुमारे २२ लाख रुपये बुडवल्यामुळे त्यांनी हे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

आपले पैसे परत मिळवण्यासाठी त्यांनी या कंपन्यांशी संबंधित अगस्त मिश्रा आणि नवनाथ अवताडे यांच्याशी वारंवार संपर्क साधला होता, मात्र त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही आणि पैसे परत मिळाले नाहीत. या सततच्या निराशा आणि आर्थिक नुकसानीमुळेच त्यांनी हे कृत्य केले असल्याचे समजते.
या घटनेमुळे चव्हाण यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुले यांचा आधार गेल्याने परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. या कंपन्यांनी लोकांना दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक करून मोठी फसवणूक केली आहे.

फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आता कायदेशीर मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रशासनाकडून या गंडा घालणाऱ्या कंपन्यांवर कठोर शासन करण्यासंदर्भात कोणतेही ठोस उपाययोजना अवलंबल्या जात नसल्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर पसरलेला आहे.
श्याम चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)
