दिनांक १२ ऑक्टोबर २०२५, अहिल्यानगर/मुंबई:
गेल्या काही दिवसांपासून राज्यातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे निरोप घेतल्यामुळे हवामान कोरडे झाले होते. मात्र, येत्या १५ ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सध्याच्या अंदाजानुसार, १५ ऑक्टोबरपासून किमान १८ ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस अपेक्षित आहे.

या वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता आणि प्रमाण विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते, जिथे या काळात अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान व वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेने खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कृषी विभागाने या बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांना विशेष आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार आपल्या शेतीचे नियोजन करावे आणि विशेषतः काढणी केलेली पिके वादळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, जेणेकरून संभाव्य नुकसान टाळता येईल.
स्रोत:(जिल्हा माहिती अधिकारी)

Advertise…
