दिनांक २३ फेब्रुवारी २०२६, श्रीगोंदा:
“अवघा रंग एक झाला” आणि “देव पाहे भाव भक्ती एका” अशी समतेची शिकवण देणाऱ्या संतांच्या भूमीतच आज महिलांना दर्शनापासून वंचित ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार वर्षानुवर्षे समोर येत आहे.
श्रीगोंदा येथील आराध्य दैवत संत शेख महंमद महाराज/बाबा यांच्या मुख्य समाधी स्थळी महिलांना प्रवेश मिळावा, या मागणीसाठी तालुक्यातील महिलांच्या वतीने तहसीलदार श्रीगोंदा यांना विशेष निवेदन देण्यात येणारं आहे.
श्रीगोंदा येथील संत शेख महंमद महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. मात्र, अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार, महाराजांच्या मुख्य समाधी कक्षात केवळ पुरुषांनाच प्रवेश दिला जातो. महिलांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते.
ही प्रथा अन्यायकारक असून ती संतांच्या मूळ शिकवणीच्या विरुद्ध असल्याचा सूर आता उमटू लागला आहे.
तहसीलदारांना देण्यात येणाऱ्या निवेदनात महिलां परखड मते मांडन्याच्या तयारीत आहेत..
भारतीय संविधानाच्या कलम १५ नुसार धर्म, वंश, जात किंवा लिंग यावरून भेदभाव करणे बेकायदेशीर आहे. मग मंदिराच्या गाभाऱ्यात हा भेदभाव का.? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
महाराजांनी आपल्या ‘योगसंग्राम‘ ग्रंथातून नेहमीच अंतर्शुद्धी, समता आणि मानवतेचा संदेश दिला आहे. त्यांच्या दरबारात भक्ती महत्त्वाची आहे..
शनी शिंगणापूर, कोल्हापूरची अंबाबाई आणि पंढरपूरचे विठ्ठल मंदिर यांसारख्या मोठ्या देवस्थानांनी काळानुरूप बदल स्वीकारून महिलांना सन्मानाने प्रवेश दिला आहे, मग श्रीगोंद्यात ही आडकाठी कशासाठी.?
प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा. मंदिर ट्रस्ट आणि संबंधित समिती सदस्यांची बैठक बोलावून चर्चा करावी आणि ज्याप्रमाणे पुरुषांना समाधीला स्पर्श करून किंवा जवळून दर्शन घेता येते, तशीच सोय महिलांसाठीही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)

