दिनांक २२ मे २०२५, अहिल्या नगर/पुणे:
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच पोलिस प्रशासनात मोठे बदल करण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या बदल्यांच्या फेरीत राज्यातील २१ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यापूर्वीच आठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, आणि आता गुरुवारी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

या बदल्यांमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवीन पोलिस अधीक्षक मिळाले असून, प्रशासनात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. यामध्ये तुषार दोशी, आंचल दलाल, नितीन बगाते, रितू खोकर, अर्चित चांडक, योगेश कुमार गुप्ता यांच्यासारख्या बड्या अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय पोलिस अधीक्षकांची नवीन नियुक्ती पुढीलप्रमाणे:
- सातारा : तुषार दोशी
- रायगड : आंचल दलाल
- रत्नागिरी : नितीन बगाते
- धाराशिव (उस्मानाबाद) : रितू खोकर
- लातूर : जयंत मीना
- अकोला : अर्चित चांडक
- कोल्हापूर : योगेश कुमार गुप्ता
- अहिल्यानगर (नगर) : सोमनाथ घार्गे

या बदल्यांमुळे पोलिस यंत्रणेत नवे नेतृत्व जिल्हास्तरावर काम करताना दिसणार आहे. प्रशासकीय पारदर्शकता, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती यावर या नव्या अधिकाऱ्यांची कामगिरी कितपत प्रभाव टाकते, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

राज्यात निवडणुका जवळ आल्याने प्रशासन सज्जतेकडे वाटचाल करत असून, बदल्यांची ही मालिका आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
