दिनांक २३ मार्च ,श्रीगोंदा:
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्या संदर्भात सरकारकडून तसेच व्यक्तिगत पातळीवर सर्व स्तरावर प्रयत्न केले जात असतानाच,त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील पुरातत्व विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्वच राज्य संरक्षित स्मारकांवर देखील पर्यटकांनी जाऊ नये असे पुरातत्व खात्याने परिपत्रक काढून आदेश दिला असल्याची माहिती पेड़गांव येथील किल्ले धर्मवीरगड (बहादुरगड) येथील रहीवाशी व शंभुसेना सामाजिक संघटनेचे पदाधिकारी लक्ष्मीकांत शिर्के यांनी दिली आहे.
नुकतीच स्वराज्य रक्षक संभाजीराजे मालिका प्रदर्शित झाल्याने शंभुभक्तांची शंभुराजेंच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळांवर होणारी गर्दी आणि त्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने अनेकांना दिलेल्या सुट्टया यामुळे त्यासंधीचा फायदा घेण्यासाठी छत्रपती शंभुराजेंच्या जीवनातील अनेक महत्वाच्या ठीकाणांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली असल्याचे,निदर्शनात आल्याने सरकारच्या पुरातत्व खात्यानेही पर्यटकांना सुचना देत गडकिल्ल्यांवर सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत न जाण्याबाबतचे परिपत्रक काढून आदेश दिला आहे.
तसेच केंद्र सरकारनेही आज २२ मार्च २०२० रोजी “जनता कर्फ्यू” लागू केल्याने कुणीही सरकारचा पुढील आदेश येई पर्यंत घरातून बाहेर न पडण्याचे आवाहनाला प्रतिसाद देत पेड़गाव येथील ऐतिहासिक शिर्के घराण्याचे वंशज व शंभुसेना संघटनेचे मार्गदर्शक लक्ष्मीकांत शिर्के यांनीही पेडगाव येथील किल्ले धर्मवीरगड (बहादुरगड) वरील छत्रपती शंभुराजांचे शौर्यस्थळ, लक्ष्मीनारायण मंदिर, बालेश्वर मंदिरासह शंभुराजांचे जन्मस्थळ किल्ले पुरंदर, युद्धस्थळ संगमेश्वर, बलिदान स्थळ तुळापुर, समाधी स्थळ वढु बुद्रुक सह अन्य गडकिल्ले तसेच पुरातन वास्तु सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत पर्यटकांसाठी बंद केल्या आहेत.
कोरोना विषाणुचा प्रसाराला रोखण्यासाठी सरकारने हे कडक निर्णय घेतले आहेत. म्हणून,आपणही सर्वांनी सरकारच्या निर्णयाचे पालन करावे असे विनंतीपूर्वक आवाहन शिर्के यांनी केले आहे.
