दिनांक ७ ऑक्टोबर(वांगदरी,श्रीगोंदा):
शासनाने मागासवर्गीय सबलीकरणासाठी दिलेल्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत, दडपशाही करून, जीवे मारण्याची धमकी देत असल्याने, वांगदरी येथील पीडित कुटुंबाने नमूद इसमांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना पीडित कुटुंबातील सदस्यांनी भेट घेऊन नमूद विषयी सविस्तर माहिती देत, तक्रार अर्ज सादर केला आहे. तसेच, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. उत्तम विठ्ठल उबाळे राहणार चिंभळा यांनी याप्रकरणी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शासनामार्फत मिळालेल्या जमिनी मध्ये आमची आई निधन झाल्यानंतर तीन भाऊ वारस हक्काने नोंद झाले असून, सात-बारावर तशी नोंद लागली आहे. गौतम व संपत हे दोन भाऊ कामानिमित्त बाहेरगावी आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वी वाल्मिक चिमाजी गोंडे नामक इसमाने चिंभळा या माझे राहत्या ठिकाणी येऊन भाडेकरारावर वांगदरी येथील जमीन देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्यास उबाळे यांनी नकार दिला होता. कालांतराने गोंडे याने वांगदरी येथील नमूद जमिनीमध्ये ताबा मिळवला व आत्ता तेथून तो हटण्यासाठी नकार देत आहे. याप्रकरणी त्यास सांगितले असता, तो मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी देत आहे. तो वांगदरी येथील प्रस्थापित राजकीय व्यक्तीच्या शाळेवर शिपाई म्हणून कार्यरत असून, राजकीय दबाव टाकण्याचाही प्रयत्न करीत असल्याचे पीडितांचे म्हणणे आहे.
अंध मुलाच्या उपचारासाठी सतत बाहेरगावी असणाऱ्या उबाळेंच्या शांत स्वभावाचा फायदा घेऊन, गोंडेचा जमीन लाटण्याचा मानस असल्याचे उबाळेचें म्हणणे आहे.
याबाबत आज दिनांक ०७ ऑक्टोबर २० रोजी उबाळे गावातील काही लोकांना घेवुन सदर क्षेत्रामध्ये गेले होते. वाल्मिक चिमाजी गोंडे याने उबाळे यांच्या नावावरील क्षेत्राचा ताबा सोडण्यास स्पष्टपणे नकार दिला असल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे.
वाल्मिक गोंडे याने दलितांना मिळालेले वर्ग २ क्षेत्रावर अतिकमण केले कारणाने त्याचेवर अॅट्रासीटी कायद्या अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास दिनांक १९ ऑक्टोबर २० रोजी तहसिल कार्यालय श्रीगोंदा येथे बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे उत्तम उबाळे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
स्रोत:(श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेला तक्रारी अर्ज)
