दिनांक २२ डिसेंबर २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यात सध्या बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी जाणे धोकादायक बनल्याने, कृषी पंपांचा वीजपुरवठा दिवसा करण्यात यावा, या मागणीसाठी आज श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महावितरणच्या (MSEB) अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले केले असून, मानवी वस्तीजवळही त्याचे दर्शन घडत आहे.
सध्या रब्बी हंगाम सुरू असल्याने पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. मात्र, महावितरणकडून रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून रात्री शेतात जावे लागते.

कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी हा वीजपुरवठा दिवसा हलवण्यात यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भैय्या ओगले यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
यावेळी त्यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव करून दिली. जर तातडीने वीज वेळापत्रकात बदल केला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही याप्रसंगी देण्यात आला.
यावेळी श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष भोईटे, श्रीगोंदा शहर काँग्रेसचे अध्यक्ष Adv. समित बुरुडे, सचिन गायकवाड, माजी सरपंच डॉ. गोरख बायकर, वडाळी गावचे सरपंच महेश दरेकर, माजी चेअरमन शंकर कोठारी, सुरज शेख, आफ्रिद इनामदार, भाऊ गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
