दिनांक १ ऑगस्ट,श्रीगोंदा:
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्याची मागणी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त करण्यात येत आहे. अण्णाभाऊचे कार्य हे वंचित, उपेक्षित, सर्वसामान्य समाजाच्या उद्धारासाठीचे कार्य आहे. त्यांनी निर्माण केलेले साहित्यही समाजाचे वास्तव चित्रण करणारे असून, त्यातून अनेकांनी प्रेरणा घेत सामान्यांच्या लढ्यात सहभाग दर्शविला आहे.
बाबासाहेबांच्या चळवळीला आपले साहित्य लेखन अर्पण करणाऱ्या अण्णा भाऊंना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा, अशी सामान्य जनतेची तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी आदर असणार्या समाजाची मागणी आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांना दिलेल्या निवेदनामध्ये सामाजिक कार्यकर्ते संदीप उमाप यांनी नमूद केले आहे की, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त चळवळीच्या लढ्यात आणि कष्टकऱ्यांच्या चळवळीत खुप मोठे योगदान राहिलेले असून, त्यांनी साहित्य लेखन व शाहिरीच्या माध्यमातून केलेले समाजप्रबोधनाचे कार्य अलौकिक आहे . तुकाराम उर्फ अण्णाभाऊ साठे यांच्या मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या, १५ लघुकथांचा संग्रह, १२ पटकथा आणि पोवाडा व लावणी शैलीतील लोककथात्मक गाणी लिहिली आहेत. त्यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ठ कादंबरीचा पुरस्कार मिळाला असुन, त्यांचे साहित्य विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतरीत झालेले आहे.त्याचबरोबर त्यांच्या लेखनावर आधारित ७ चित्रपटही प्रसिद्ध आहेत.
महाराष्ट्र शासनाने चालु वर्षी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले. थोर समाजसुधारक, साहित्य सम्राट, लोकशाहीर तुकाराम उर्फ अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ मिळावा यासाठी सामान्य जनतेकडून व समाज बांधवांकडून मागणी जोर धरत आहे. संदीप उमाप (राष्ट्रवादी काँग्रेस.तालुकाध्यक्ष, सामाजिक न्याय) यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार समाज बांधवांच्या हजारो स्वाक्षरी असल्याचे पत्र ते लवकरच महाराष्ट्र शासनाला पाठवणार असल्याचे सांगितले आहे.
स्रोत:(संदीप दिलीप उमाप यांनी मुख्यमंत्री महा.राज्य यांना दिलेले पत्र)
