दिनांक: २० जून २०२४
स्थान: श्रीगोंदा..
टाकळी कडेवळीत, ता. श्रीगोंदा येथील शेतकरी वामन गेणा रणसिंग यांच्या विहीरीवर इसम संजय शामराव इथापे (रा. टाकळी कडेवळीत, ता.श्रीगोंदा) याने ब्लास्टींगचे कामासाठी मजुर ठेवून त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण, साधने वा सुरक्षा न देता कामाला लावले होते. या दुर्घटनेत जिलेटीनच्या कांड्या विहीरीचे होलमध्ये भरतांना स्फोट होऊन मजुर सुरज ऊर्फ नसीर युसूफ इनामदार, गणेश नामदेव वांळुज (दोन्ही रा. टाकळी कडेवळीत) व नागनाथ भागचंद्र गावडे (रा. बारडगांव, ता. कर्जत) यांचे मृत्यू व ३ मजुरांचे गंभीर दुखापतीस कारणीभूत झाले.
यावरून संजय शामराव इथापे यांचे विरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये भादवि ३०४, २८५, २८६, ३३७, ३३८ सह बारी अधिनियम कलम ३, ४, ५ व ६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
घटनेनंतर मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून, गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
दिनांक १७ जून २०२४ रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी संजय इथापे याचा शोध घेतला. आरोपी हडपसर, जिल्हा पुणे येथे असल्याची खात्रीशीर माहिती गुप्तबातमीदारांमार्फत मिळाल्याने पथकाने तत्काळ हडपसर येथे जाऊन आरोपीला अटक केली. त्यास श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. विवेकानंद वाखारे, उविपोअ, कर्जत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
स्रोत: (प्रसिद्धी पत्र)


