दिनांक २७ एप्रिल २०२६ श्रीगोंदा:
महाराष्ट्र राज्य सरकारी व निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने २१ एप्रिल पासून पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये श्रीगोंद्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
विधानसभेच्या पटलावर मान्य झालेल्या मागण्यांचा शासनाला विसर पडल्याने व प्रलंबित मागण्यांचे घोंगडे कायमच भिजत ठेवल्यामुळे कर्मचारी बेजार होऊन सरकार कर्मचाऱ्याबाबत दुजाभाव का करत आहे? हा प्रश्न सर्व कर्मचाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, चतुर्थ श्रेणी वरील भरती बंदी तत्काळ उठवणे,१०:२०:३० वर्षाच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनाचा लाभ तत्काळ लागू करणे, कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करणे, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करणे, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती तत्काळ देणे, अशा विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये एम एस लगड, बापूसाहेब गायकवाड, देवराम दरेकर, देविदास खेडकर, डीपी पुराने, बंटी सुपेकर, रामदास जंजिरे, उत्तमराव भुजबळ, शरद पवार, शिवाजी नागवडे इथापे सर तसेच महादजी शिंदे विद्यालय व कन्या विद्यालय श्रीगोंदा चे सर्व कर्मचारी, तालुक्यातील इतर सर्व शाखांचे कर्मचारी, तसेच तालुका समन्वय समितीतील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुख्याध्यापक संघाच्या वतीने माध्यमिक शिक्षक सोसायटीचे मा. चेअरमन दिलीपराव काटे हे उपस्थित होते.
