दिनांक १ मे,मुंबई :
महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६० वर्ष पूर्ण झाली असून या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन केले.या ध्वजारोहण समारंभाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,आमदार भाई गिरकर, मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल तसेच वरिष्ठ शासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते.‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अतिशय काटेकोरपणे ‘सोशल डिस्टन्सिंग’ चे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यामुळे प्रथमच मंत्रालयात झालेला हा ध्वजारोहण कार्यक्रम साधेपणाने पण उत्साहात झाला.मुख्यमंत्री हे स्वतः वाहन चालवीत हुतात्मा स्मारक व मंत्रालय येथील कार्यक्रमासाठी पोहोचले.
(वृत्तसंस्था)
