दिनांक ३१ मे,श्रीगोंदा:
ग्रामीण विकास केंद्र ही संस्था गेले पंचवीस वर्षापासून भटके-विमुक्त, आदिवासी, वंचित, अपेक्षित, समाजाच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी असून, या समाजासाठी संस्थेचे संस्थापक अरुण जाधव मदत रुपी कार्यरत आहेत.
आज कोरोना महामारीच्या काळात सुद्धा लाखमोलाची मदत या संस्थेने अहमदनगर जिल्ह्यात केली आहे.गेल्या पंचवीस दिवसात पहिल्या टप्प्यात १५०० कुटुंबांतील ७८५० व्यक्तींना मदत केली. तर, आज श्रीगोंद्यातील काष्टी, वांगदरी, हंगेवाडी, सांगवी दुमाला, लिंपणगाव तर पुणे जिल्ह्यातील इनामगाव आणि कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे दुसऱ्या टप्प्यात ३१५ कुटुंबांतील १५९५ व्यक्तींना मदत केली.
हे किट वाटप करताना वृद्ध आजी, आजोबा व कोरोना या महामारीत लॉक डाऊन काळात रोजंदारी थांबलेले कुटुंबांतील व्यक्ती स्वीकारताना भावनिक होऊन न कळत त्यांचे डोळे पाणावत होते. ग्रामीण विकास केंद्र या संस्थेचे अभिनंदन करून, संस्थेचे संचालक बापू ओहोळ सर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत होते. ग्रामीण विकास केंद्र या संस्थेने जे खरंच उपाशी आहेत आणि ज्यांना आज अन्नधान्याची व किराण्याची गरज आहे व कुटुंबातील व्यक्ती उपाशी आहेत. अशाच कुटुंबांना आज मदत करण्यात आली.
ग्रामीण विकास केंद्र ही संस्था जामखेड येथे असतानाही आज श्रीगोंद्यातील व्यक्तींना मदत करत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे.आमची नाळ संस्थेशी जोडली गेली असून, आम्ही सदैव या संस्थे सोबत आहोत.असे किट स्वीकारणाऱ्या व्यक्ती म्हणाल्या.
ही मदत ग्रामीण विकास केंद्र जामखेड, कोरो मुंबई व अल्कमाईन केमिकल इंडस्ट्रीज दौंड या संस्थांनी व कंपनीने मिळून मदत केली. हा किराणा वाटप करताना ग्रामीण विकास केंद्र जामखेड या संस्थेचे अॅड.डॉ.अरुण जाधव सह संस्थेचे संचालक बापू ओहोळ सर यांनी फार कष्ट घेतले. तसेच, भगवान राउत, सचिन भिंगारदिवे, वैजनाथ केसकर, संतोष चव्हाण, साळवे राकेश, संतोष भोसले, लता सावंत, काळे मनीषा, छाया भोसले, मनीषा राऊत रोहिनी, सुनिता बनकर, उज्वला मदने, पल्लवी शेलार, पुष्पा कुसळकर, यशोदा काळे, जालिंदर शिंदे, ज्योती भोसले, वीर गोरे, मयूर भोसले या कार्यकर्त्यांनी गरजवंतांना मदत पोहोचवण्यासाठी कष्ट घेतले.
सांगवी दुमाला या गावात सत्तर कुटुंबातील ३७५ व्यक्तींना किराणा वाटप केलेले पाहून, येथील सरपंच विजयराव भोईटे, उपसरपंच शरदराव नलगे, सदस्य शुभांगी भोसले, तसेच सांगवी दुमाला या गावचे पोलीस पाटील हरिभाऊ भोसले या ग्रामपंचायतीतील जबाबदार व्यक्तींनी ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक बापू ओहोळ सर व लोकाधिकार आंदोलन संघटनेचे अहमदनगर जिल्हा समन्वयक संतोष भोसले यांचा विशेष सत्कार करून संस्थेचे कौतुक केले.अशी माहिती लोकाधिकार आंदोलन संघटनेचे अहमदनगर जिल्हा समन्वयक संतोष भोसले यांनी दिली.
