कुकडी व घोड प्रकल्पातील प्रलंबित कामांचा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आढावा. कालवा दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही.



अहिल्यानगर, दि. ५ (जिमाका):

राज्याला दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने जलसंपदा प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण करण्यावर शासनाचा भर असून, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

श्रीगोंदा येथे आयोजित बैठकीत त्यांनी कुकडी व घोड प्रकल्पातील प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी जलसंपदा विभागाची कामे वेळेत पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिल्या टप्प्यात दोन वर्षांत पूर्ण होऊ शकणाऱ्या कामांना प्राधान्य देण्यात येत असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.

पालकमंत्री म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्यातील पाच महत्त्वाच्या विकासकामांच्या निविदा पूर्ण झाल्या असून, या माध्यमातून तब्बल १३२ कोटी रुपयांची विकासकामे हाती घेतली जात आहेत. कालव्यांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. सिंचन व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी वेळेत आणि पूर्ण क्षमतेने मिळणे हेच शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत त्यांनी विविध कामांबाबत अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सरस्वती नदीतील गाळ काढणे, नदीचे रुंदीकरण तसेच सुशोभीकरणासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच विसापूर व कुकडी कालव्याची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, पाणी वापर संस्थांची बैठक आयोजित करून शेतकऱ्यांशी समन्वय वाढवावा आणि अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्या तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय राहिल्यास शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न वेगाने मार्गी लागू शकतात. पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत सिंचनाशी संबंधित अनेक प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीपूर्वी त्यांनी रुईगव्हाण येथील कुकडी डावा कालवा भोसे खिंड शीर्ष विमोचक तसेच बंदिस्त नलिका वितरण प्रणालीची देखील त्यांनी पाहणी केली.

यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव,  उपविभागीय अधिकारी श्री. चिंचकर, तहसीलदार, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत कुकडी व घोड प्रकल्पांशी संबंधित विविध विकासकामे, कालव्यांच्या दुरुस्त्या, सिंचन व्यवस्थेची कार्यक्षमता आणि शेतकऱ्यांच्या समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

स्रोत:(जिल्हा माहिती कार्यालय)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading