दिनांक २१ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:
गेल्या अकरा वर्षांपासून सर्वसामान्यांचे प्रश्न, सामाजिक आणि राजकीय मुद्दे, तसेच समाजहिताच्या घटनांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे ‘बहुजन समता पत्र’ आता ‘निर्भीड कलम’ या नावाने कार्यरत झाले आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक व्यापक आणि प्रभावी पद्धतीने समाज माध्यमांवर सक्रिय राहण्याच्या उद्देशाने या न्यूज पोर्टलचे रूपांतर करण्यात आले आहे.

याचा लोकार्पण सोहळा दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी श्रीगोंदा येथील राहुल विद्यार्थी वस्तीगृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, पत्रकार आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये वस्तीगृहाचे संचालक सतीश ओहोळ, जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल ठवाळ, शिवसेनेचे बाळासाहेब दुतारे, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अमर घोडके, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे तालुकाध्यक्ष संजय रणसिंग, पत्रकार जावेद इनामदार, मराठी पत्रकार परिषदेचे नूतन तालुकाध्यक्ष पीटर रणसिंग, तसेच पत्रकार अमोल झेंडे, सिटीझन वृत्तपत्राचे उपसंपादक राजू शेख, आणि नवराष्ट्र वृत्तपत्राचे पत्रकार व प्रशासक न्यूज पोर्टलचे संचालक विशाल चव्हाण यांचा समावेश होता.

कार्यक्रमात पोलिस अधिकारी सचिन गोरे, मनीषा घोडके, अवनी घोडके, सामाजिक कार्यकर्ते अमोल डाळिंबे, संभाजी ब्रिगेडचे नानासाहेब शिंदे, आणि वस्तीगृहातील विद्यार्थीही उपस्थित होते.

निर्भीड कलम: सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवरील ठोस भूमिका.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी निर्भीड कलम च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष सुनील ओहोळ यांनी आपल्या भाषणात सामाजिक चळवळीत वृत्तपत्र आणि न्यूज पोर्टलच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “सद्यस्थितीत माध्यमांवर होणारा हस्तक्षेप वाढत असताना स्वतंत्र आणि निर्भीड माध्यमांची गरज अधिक भासते.”असे सांगितले.
त्यांनी निर्भीड कलम च्या कार्याचा गौरव करत समाजमाध्यमांमुळे सर्वसामान्यांना आपली बाजू मांडण्यासाठी नवा मंच उपलब्ध झाल्याचेही अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक अमर घोडके यांनी केले, तर आभार प्रदर्शन निर्भीड कलम चे संचालक चंदन घोडके यांनी व्यक्त केले.
समाजासाठी समर्पित माध्यम…
निर्भीड कलम हे फक्त एक न्यूज पोर्टल नसून, सामाजिक प्रश्नांना आवाज देणारे आणि निर्भीडपणे सत्य मांडणारे माध्यम म्हणून कार्य करेल, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. या पोर्टलच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरांवरील प्रश्न मांडले जातील, अशी खात्री वस्तीगृहाचे संचालक सतीश ओहोळ यांनी व्यक्त केली.
स्रोत:(शुभारंभ सोहळा)
