दिनांक २० जानेवारी २०२४, श्रीगोंदा:
तालुक्यातील भिंगाण दुमाला गावाजवळील शेतकरी मच्छिंद्र रामभाऊ शिंदे यांच्या शेतातून १७ जानेवारी रोजी रात्री १० ते १२ च्या दरम्यान कांदा चोरीचा प्रकार घडला आहे. दोन ते तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातून पाच गोणी कांदा चोरून नेला. सध्या बाजारभावानुसार कांद्याची किंमत प्रति किलो ४० रुपये असल्याने शिंदे यांचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

भिंगाण परिसरात लिंबू, कांदा, चंदन, हरभरा, कापूस यासह विविध पिकांच्या चोरीचे प्रकार सतत घडत आहेत. मच्छिंद्र शिंदे यांचेच बंधू गोरख शिंदे यांच्याही शेतातून काही महिन्यांपूर्वी दोन क्विंटल कापूस चोरीला गेला होता. या भागात याआधी लिंबू चोरट्यांना पकडून श्रीगोंदा पोलीस स्टेशनकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र कांदा चोरीच्या घटनेने पुन्हा शेतकरी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांची मागणी: कडक कारवाई करा..
या घटनेची माहिती मिळताच मच्छिंद्र शिंदे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना लेखी पत्राद्वारे घटनेची तक्रार दिली आहे. शेतकरी वर्गाने चोरांचा त्वरित शोध घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सततच्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, तसेच परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची गरज शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे.
स्रोत:(निवेदन)



जाहिरात..
