दिनांक ०१ जुलै २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरात आणि परिसरात चोरीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने व्यापारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मागील तीन ते चार दिवसांत शहरात जवळपास दहा ते बारा ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय काष्टी गावात मागील महिन्याभरात अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत आणि तालुक्यातील इतर गावांमध्ये देखील चोरीच्या घटना थांबत नाहीत.
विशेषत: श्रीगोंदा शहरातील मुख्य बाजारपेठेत झालेल्या चोरीच्या घटनांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी करत असलेल्या व्यक्ती स्पष्ट दिसत असून देखील अद्याप चोरांना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे चोरांचे मनोबल वाढले आहे आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
या वाढत्या चोरीच्या घटनांवर कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी तहसिलदार श्रीगोंदा, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, पोलीस अधीक्षक अहमदनगर, पोलीस उपअधीक्षक कर्जत आणि पोलीस निरीक्षक श्रीगोंदा यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी तात्काळ रात्रीची गस्त वाढविण्याची आणि झालेल्या चोरीचा जलद गतीने तपास करून चोरांना अटक करण्याची मागणी केली आहे. जर त्वरित उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर, दिनांक १६ जुलै २०२४ पासून श्रीगोंदा शहरातील सर्व व्यापारी बांधव बेमुदत बंद पाळतील आणि पोलिसांच्या निष्क्रियतेविरुद्ध मोर्चा काढतील असा इशारा दिला आहे. या मोर्चाची संपूर्ण जबाबदारी श्रीगोंदा पोलिस निरीक्षकांवर राहील असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत असल्याने प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. आंदोलनात ॲड.वैभव मेहता, राहुल कोठारी, टिळक भोस, सतीश बोरुडे, रमेश भंडारी चंद्रकांत कटारिया दादासाहेब दळवी निलेश कंजारी सुनील खामकर संदीप उमाप रमेश मखरे विनोद खेंडके सुरेश रंधवे निलेश मेहेर अभिनंदन पिपाडा आयकर नंदकुमार योगेश भंडारी अतुल मेहता मुकुंद सोनटक्के, सुनील ढवळे, युवराज पळसकर, सागर जाधव, गणेश शेळके. इत्यादी व्यापारी आणि पीडित नागरिक उपस्थित होते.

स्रोत:(आंदोलन)




