दिनांक १२ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:
२२६ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात सर्व उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ करताना जाहीरनाम्यात विकासाची वचने दिली आहेत. विशेषत: सैनिक समाज पार्टीचे उमेदवार विनोद साहेबराव साळवे (चिन्ह ट्रंपेट) यांनी संत शेख महंमद बाबा यांच्या दर्ग्यात शाल अर्पण करून प्रचाराला सुरुवात केली. साळवे यांनी आपल्या भाषणात श्रीगोंदा तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांचा उहापोह केला, ज्यामध्ये ग्रामीण भागातील पाणी समस्या, सिंचन योजना, तरुण बेरोजगारी आणि एमआयडीसीसारख्या विकास योजनांचा समावेश आहे.
विनोद साळवे यांनी नमुद केले की, श्रीगोंद्यामध्ये अनेक वर्षांपासून ग्रामीण विकास योजना प्रलंबित आहेत. ते म्हणाले, “अनेक निवडणुका झाल्या, परंतु पाणी योजना आणि सिंचन प्रकल्पांना मात्र जसंच्या तसं ठेवण्यात आलं आहे.” श्रीगोंद्यात एमआयडीसी प्रकल्पाच्या माध्यमातून तरुण बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं जातं, परंतु आजपर्यंत त्याचं ठोस स्वरूपात काहीच झालेलं नाही.
साळवे यांनी आपल्या प्रचाराच्या ठळक मुद्द्यांमध्ये कारखानदारीच्या जोरावर उभ्या असलेल्या घराणेशाहीवर कठोर टीका केली. “सत्तेतून कमावलेल्या संपत्तीच्या आधारावर हे नेते आपल्या वारसांना पुढे नेत आहेत. घराणेशाहीला हरवून सर्वसामान्यांचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी मला पाठिंबा द्या,” असं आवाहन त्यांनी मतदारांना केले.
याप्रसंगी रावसाहेब काळे पाटील (प्रदेशाध्यक्ष छावा संघटना), श्रीधर शेलार (जिल्हाध्यक्ष, धडक कामगार संघटना, अहमदनगर), ह भ प राजू महाराज पाटोळे, तनीज शेख मॅडम (जिल्हाध्यक्ष छावा संघटना, अहमदनगर), नितीन गोरडे सर (जिल्हा उपाध्यक्ष आरपीआय), मालन जाधव (महिला उपाध्यक्ष, छावा संघटना), ॲड. शिवाजी डमाळे सर (प्रदेशाध्यक्ष, सैनिक समाज पार्टी), बाबू थोरात, ज्योतीताई पाटोळे, सुभाष काकडे, विजय जगताप, सरिता जगताप इत्यादींसह सैनिक समाज पार्टी आणि छावा संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

शनी चौक परिसरातून संत शेख महंमद बाबा दर्गा पर्यंत ढोल ताशाच्या गजरामध्ये भव्य रॅली काढून दर्गात संत शेख महंमद बाबा यांच्या समाधीला चादर अर्पण करण्यात आली व प्रचार आरंभ करण्यात आला.
स्रोत:(मुलाखत)




