दिनांक ७ जुन २०२४, श्रीगोंदा:
नगर दक्षिण मतदारसंघातून निवडून आलेले नवे खासदार लंके यांच्या निवडीनंतर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे तालुक्यातील नागरिकांना नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विशेषतः पाण्याच्या प्रश्नावर खासदारांची तातडीची कार्यवाही अपेक्षित आहे.
चांभूर्डी गावाचा पाण्याचा प्रश्न:

श्रीगोंदा तालुक्यातील जवळपास ७९ गावांसाठी जल जीवन योजनेअंतर्गत मंजूर पाणी योजनांचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू झाले होते. मोजक्या गावांमध्येच ही योजना यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, परंतु, चांभूर्डी गावात अद्यापही पाण्यासाठी आखलेली “जल जीवन मिशन” योजना अपूर्ण आहे. परिणामी, गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि त्यांना स्थानिक प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरवावे लागत आहे.
पंधरा वर्षांपूर्वी ७५ लाख रुपये खर्चून चांभूर्डी गावात पाणी योजनेचे काम सुरू झाले होते, परंतु ते पूर्ण न होताच थांबले, आणि सर्व पैसे वाया गेले. यंदा देखील जुन्या विहिरीचा प्रस्ताव मंजूर नसल्याने नवीन विहीर मंजूर झाली नाही. अभियंता भोसले यांनी याबाबत दुरुस्ती प्रस्ताव पाठवण्याचे सांगितले आहे. कडूस गावातील विहीर चांभूर्डी गावाला देण्याची तोंडी हमी दिली असली तरी, ती विहीर पारनेर तालुक्याच्या हद्दीत असल्यामुळे अडचणी येऊ शकतात.
चांभूर्डी गावाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नवीन खासदारांनी तातडीने लक्ष घालून अभियंता भोसले यांना योग्य त्या सूचना द्याव्यात.. अशी गावकऱ्यांची नम्र विनंती आहे. त्यांच्या लक्षावधी रुपयांच्या पाणी योजनांचा लाभ गावकऱ्यांना मिळावा, यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन केले जात आहे. खासदारांच्या कार्यवाहीने गावकऱ्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण होईल अशी अपेक्षा निवेदनात श्री.श्रीरंग साळवे सर यांनी व्यक्त केली आहे.

स्रोत:(श्रीरंग साळवे)
