दिनांक ३ मार्च २०२४, अहमदनगर, जावेद इनामदार:
भाजपा हा देशात प्रथम क्रमांकाचा पक्ष आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब तसेच, भारतीय जनता पार्टीने मुस्लिम समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवून समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मुस्लिम समाजाने भारतीय जनता पार्टीला मतदान करावे. असे प्रतिपादन भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी केले आहे.
मा.आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अहमदनगर येथील कार्यालयात गुरुवार दिनांक २९ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा अहमदनगर लोकसभा स्नेहसंवाद बैठक व नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी मुलतानी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे सदस्य तसेच भाजपा अल्पसंख्यांचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान होते.
पुढे बोलताना मुलतानी म्हणाले की, भारतीय जनता पार्टी हा सर्वात जास्त खासदार, आमदार, झेडपी सदस्य, सरपंच, व नगरसेवक असणारा पक्ष आहे. व पार्टीने आपल्यावर विश्वास ठेवून, आपणास लोकसभा अल्पसंख्यांक बहुल भागामध्ये संयोजक, सहसंयोजाक तसेच बूथ प्रमुख बनवले आहे. व आपणावर एक मोठी जबाबदारी पार्टीने सोपवली आहे.
होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा पक्षाच्या ज्या उमेदवाराला उमेदवारी देईल त्या उमेदवारास आपल्या बूथ मधून जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्याची सक्षम जबाबदारी आपण पार पाडायची आहे. कार्यकर्त्यांनी एखाद्याच्या वाढदिवसाला जाऊन केक कापून हजर राहून पक्ष वाढत नसतो तर, त्यासाठी तळागाळातील लोकांना बरोबर घेऊन त्यांचे कामे मार्गी लावून देण्याचे काम करावे. व पक्ष संघटना वाढीसाठी मजबुतीसाठी प्रयत्न करावेत.
भाजपा हा घराणेशाहीचा पक्ष नसून, तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. केंद्र सरकारने मुस्लिम समाजातील गरजू लोकांसाठी घरकुल योजना तसेच विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना असे अनेक विकास योजना राबविले आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजाने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. असे मत मुलतानी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच उपस्थित पदाधिकारी व बूथप्रमुखांचे स्वागत अल्पसंख्याक मोर्चाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष तय्यब भाई बेग यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बेग यांनी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाची अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्यकारणी जाहीर केली.तसेच प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर उपस्थितांचे आभार जिल्हा उपाध्यक्ष जावेद इनामदार यांनी मानले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान, जिल्हाध्यक्ष तय्यब भाई बेग, जिल्हा उपाध्यक्ष जावेद इनामदार, तालुकाध्यक्ष अकील इनामदार, रफिक शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष दिलावर पठाण, निसार शेख, जहीर शेख, जमीर अत्तार, मुसा शेख यांच्यासह अहमदनगर, श्रीगोंदा, जामखेड, राहुरी, शेवगाव, पारनेर तालुक्यातील अल्पसंख्यांक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
