आधुनिक युगात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात मोलाची कामगिरी करत आहेत. भारतीय स्त्रीला हे स्वातंत्र्य मिळवून देण्यात सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाट आहे. त्यांच्या पतीसह त्यांनी शिक्षण प्रसाराचे आणि समाज सुधारणेचे काम करण्यात आयुष्य खर्ची केले.
बालपण :
सावित्रीबाई यांचा जन्म ३ जानेवारी, १८३१ मध्ये साताऱ्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते. तेव्हा बालविवाहाची प्रथा रूढ असल्यामुळे वयाच्या सातव्या वर्षापासूनच सावित्रीबाईंच्या आई – वडिलांनी स्थळ पाहण्यास सुरु केले. १८४० साली नऊ वर्षाच्या असताना सावित्रीबाईंचा विवाह ज्योतीराव फुले यांच्याशी झाला. तेव्हा ज्योतीरावांचे वय अवघे तेरा वर्षाचे होते. सावित्रीबाई एका ख्रिश्चन मिशनर्यांनी दिलेले पुस्तक सासरी घेऊन आल्या. ज्योतीरावांना त्यांच्या मावस बहिण सगुणाऊमुळे आधीच शिक्षणाची ओढ होतीच पण, त्यांनी आपल्या पत्नीला असलेली शिक्षणाची आवड ओळखून त्यांनाही शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले.

वैयाक्तिक आयुष्य :
सावित्रीबाई व ज्योतीराव फुले यांना स्वताचे अपत्य नव्हते. त्यांनी एका विधवेला व तिचा मुलगा यशवंत याला आधार दिला होता. पुढे त्यांनी यशवंतलाच रीतसरपणे दत्तक घेतले. तसेच त्याच्या आई, काशीबाईचाहि सांभाळ केला.त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. म्हणून, त्यांनी स्त्रीला सुशिक्षित व स्वावलंबी बनविण्याचा तसेच दलितांच्या उद्धाराचा विडा उचलला. त्यांना समाजातील सर्व पातळींवरून कडाडून विरोध झाला. परंतु, सर्व छळाला तोंड देत त्यांनी त्यांचे आंदोलन चालू ठेवले.
सामाजिक कार्य :
ज्या काळात स्त्रीला चूल व मुल या बंधनात अडकवून ठेवले होते, त्या काळात जात, धर्म, लिंग यावर आधारित समाजव्यवस्थेला न जुमानता सावित्रीबाईंनी स्त्रीमुक्तीचा व स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. १ मे, १८४७ साली त्यांनी दलितवस्तीत शाळा चालू केली व सगुणाऊला शाळा चालवण्यास नेमले. १ जानेवारी, १८४८ मध्ये ज्योतीराव व सावित्रीबाईंनी सर्वात पहिली मुलींची शाळा सुरू केली. ब्रिटीशांच्या काळात भारतीय व्यक्तीने सुरु केलेली ही पहिली शाळा होती. तसेच, पुण्यात व मुंबईतही मुलींसाठी शाळा सुरु केल्या. गिरगावातील कमळाबाई हायस्कूल अजूनही कार्यान्वित आहे.
स्रोत:(गूगल…)
बहुजन समता पत्र परिवारातर्फे सावित्रीमाई च्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व विनम्र अभिवादन..
